
‘बारा बलुतेदारांना स्वतंत्र आरक्षण द्यावे’
पुणे, ता. २७ : राज्यातील बारा बलुतेदार व खऱ्या भटक्या-विमुक्तांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी. रोहिणी आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच बारा बलुतेदारांना स्वतंत्र सहा टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ‘ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा’मार्फत करण्यात आली आहे.
यासाठी राज्यभर जनजागरण मोर्चा राबविण्याचे ठरले आहे, अशी माहिती जनमोर्चाचे उपाध्यक्ष डॉ. पी. बी. कुंभार आणि महासचिव बालाजी शिंदे यांनी शनिवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. सुधीर अनवले, डॉ. दीपक महामुनी, राकेश खडके, अनिता गोरे या वेळी उपस्थित होते.
राज्यातील सर्व राज्यकर्ते आरक्षणाची भाषा बोलतात. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात. मात्र असंघटित, बारा बलुतेदार व दरवेशी, नंदीवाला, गारुडी आदी भटक्या विमुक्तांना आजही न्याय मिळाला नाही. ‘जी. रोहिणी आयोगा’ने संपूर्ण देशात सर्व्हे केला. देशातील ९४५ जाती आजही त्या सर्व्हेच्या लाभांपासून दूर आहेत, अशी माहिती डॉ. कुंभार यांनी दिली.