
आयुर्वेद ‘सोरायसिस’सारख्या गंभीर आजारावर प्रभावी ः वैद्य गोपाकुमार कायायुर्वेदतर्फे ‘कायाकेशकल्पना’वर ज्ञानसत्राचे आयोजन
पुणे, ता. २८ : ‘‘सोरायसिस आजार गंभीर असला, तरी आयुर्वेदात त्यावर उपचार आहेत. आयुर्वेद शास्त्रातील पंचकर्म, अग्निकर्म, शुद्धीकरण अशा विविध उपचार पद्धतीने सोरायसिसला समूळ नष्ट करता येते. त्यामुळे या सारख्या त्वचारोगावर आयुर्वेदशास्त्र प्रभावीपणे ठरत आहे,’’ असे प्रतिपादन केरळ येथील वैद्य गोपाकुमार यांनी केले.
वैद्य हरिश पाटणकर यांच्या ‘कायायुर्वेद’तर्फे आयोजित ‘कायाकेशकल्पना’ या विषयावरील ज्ञानसत्रात गोपाकुमार बोलत होते. ‘आयुर्वेद व त्वचाविकार’ यावर वैद्य गोपाकुमार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य (बोर्ड ऑफ आयुर्वेद) डॉ. अतुल वार्ष्णेय होते. प्रसंगी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’चे जयपूर येथील प्रा. डॉ. पवनकुमार गोदातवार, वैद्य हरीश पाटणकर, डॉ. स्नेहल पाटणकर उपस्थित होते.
आयुर्वेदामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विशेष बदल घडविणे गरजेचे असून, यामध्ये वैद्यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे डॉ. वार्ष्णेय नमूद केले. डॉ. यी. मेन्द्र व डॉ. आंचल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विवेक आंबरे यांनी आभार मानले.