वैष्णवांच्या साक्षीने जलसंवर्धनाचा निर्धार

वैष्णवांच्या साक्षीने जलसंवर्धनाचा निर्धार

Published on

पुणे, ता. २ ः वैष्णवांचा मेळा, टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष अशा वातावरणात विठुरायाच्या ओढीने पंढरीच्या वाटीवर निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने पुणेकरांनी मंगळवारी जलसंवर्धनाचा निर्धार केला. ‘साथ चल’ उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत हजारो पुणेकरांनी शुद्ध पाण्याचे आणि पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जलसंवर्धनाची शपथ घेतली.
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने शुक्रवारी सकाळी मार्गस्थ झाला. या पालखी मार्गावर पुलगेट येथील महात्मा गांधी बसस्थानक परिसरात ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे ‘साथ चल’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘वारी विठुरायाची अन् जलसंवर्धनाची’ अशी यंदाच्या उपक्रमाची संकल्पना होती. त्यानुसार पालखी सोहळ्यातील वारकरी आणि उपक्रमात सहभागी झालेल्या शहरवासीयांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली. पुणेकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जलसंवर्धनाचा जागर केला. याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची लगबग सुरू झाली होती. कपाळी चंदनाचा टिळा लावलेल्या अन् पारंपरिक वेश धारण केलेल्या नागरिकांमुळे भक्तीमय वातावरणाची अनुभूती येत होती. पुलगेट येथे पोहोचलेल्या पुणेकरांनी वारकऱ्यांसह ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा जयघोष करत टाळ-मृदंगांवर ताल धरला होता. ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘माऊली माऊली’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. कपाळी गंध, गळ्यात उपरणे आणि हातात टाळ अशा वेशभूषेतील बालगोपाळ साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ होत असताना उपस्थितांनी विठ्ठलाचा आणि संतांचा नामघोष केला. भाविकांनी पालख्यांचे दर्शन घेतले, तसेच वारकऱ्यांसमवेत काही पावले चालत वारी अनुभवण्याचा प्रयत्न केला.

चंद्रभागा नदी म्हणजे तीर्थ आहे. चंद्रभागेत स्नान केल्याशिवाय वारकऱ्याला पूर्णत्व येत नाही. पण अशी ही चंद्रभागा नदी आणि अन्य बऱ्याच नद्या आज प्रदूषित झाल्या आहेत. या नद्या स्वच्छ व्हाव्यात, ही आमची प्राधान्याने मागणी आहे. ‘सकाळ’तर्फे दरवर्षी ‘साथ चल’ हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात त्यांनी यंदा जलसंवर्धनाचा जागर करत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत नद्यांच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे, ही बाब महत्त्वपूर्ण आहे.
- पुरुषोत्तम महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.