‘जल जीवन मिशन’ योजना त्वरित पूर्ण करा

‘जल जीवन मिशन’ योजना त्वरित पूर्ण करा

Published on

पुणे, ता. ४ : ‘‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे त्वरित पूर्ण करा,’’ असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी गुरुवारी (ता. ४) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिला.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा, या उद्देशाने आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनांची दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी करावी. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत (हर घर जल) सुरु असलेली सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात यावे आणि या योजनांच्या प्रगतिपथावर असलेल्या कामांची माहिती जिओ टॅगिंगसह भौगोलिक माहिती संगणक प्रणालीत भरावी, पाणी योजनांसाठी आवश्‍यक जागा हस्तांतरित करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अडचण येत असल्यास, अशा गावांची यादी संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात यावी. भोर, दौंड, इंदापूर व आंबेगाव तालुक्यातील अपूर्ण कामेही प्राधान्याने पूर्ण करावीत.
जिल्ह्यातील १९ ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. त्यामुळे ही कामे रस्त्याअभावी प्रलंबित राहिली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील ही प्रलंबित कामे संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वयातून पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

३६६ पाणी योजना कार्यान्वित...
बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाथरवट यांनी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनांच्या कामाबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सध्या पुणे जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या १ हजार २३९ योजनांची कामे सुरु असून, आतापर्यंत २३५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. अन्य ३६६ ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

जीवन प्राधिकरणांतर्गत १११ योजनांची कामे सुरू...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती कार्यकारी अभियंता नाडगौडा यांनी दिली. सध्या प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठ्याच्या १११ योजनांची कामे सुरू असून, आतापर्यंत ४ योजना पूर्ण झाल्या आहेत. ३० योजनांची कामे ही ७५ टक्के पूर्ण झाली असून, उर्वरित ५१ योजनांच्या कामांची भौतिक प्रगती ही ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.