सरकारी शाळांना पालकांनीच केले ‘नापास’!

सरकारी शाळांना पालकांनीच केले ‘नापास’!

पुणे, ता. २९ : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा आठ लाख ८६ हजार ४११ रिक्त जागांकरिता सोमवारी सायंकाळपर्यंत केवळ ५२ हजार ६८ अर्ज आले आहेत. पुणे जिल्ह्यातील ७३ हजार २६३ जागांकरिता १४ हजार ७५९ अर्ज इतकेच आले आहेत. या प्रवेशप्रक्रियेत यंदा खासगी शाळांबरोबरच सरकारी आणि अनुदानित शाळांमधील राखीव जागा दर्शविण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने केलेल्या नव्या बदलाबाबत नाराजी व्यक्त करीत पालकांनी सरकारी आणि अनुदानित शाळांना ‘नापास’ ठरविल्याचे चित्र आहे.
या प्रवेशप्रक्रियेच्या अंतर्गत गेल्या वर्षी (शैक्षणिक वर्ष २०२३-२४) आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४७ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी तब्बल तीन लाख ६४ हजार ४१३ अर्ज आले होते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नऊ हजार ८६ शाळांनी नोंद केली होती. यातील एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी तब्बल दुप्पट म्हणजेच दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले होते. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता यंदा पालकांनी या प्रवेशप्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
या प्रवेशप्रक्रियेच्या अंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तरच अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळेल. असा बदल राज्य सरकारने यावर्षी केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांसह सरकारी आणि अनुदानित शाळांची देखील नोंदणी केली आहे. यातून प्रवेशासाठी उपलब्ध रिक्त जागांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असली, तरी त्या तुलनेत प्रवेश अर्ज करण्याला पालकांनी नापसंती दर्शविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
...........
यंदा २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार नसल्याने पालकांनी अर्ज भरणेच नाकारले आहे. त्यात प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या बऱ्याचशा सरकारी शाळा केवळ इयत्ता चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे पालक नाराजी व्यक्त करीत आहेत. पालकांची दिशाभूल करून श्रीमंतांसाठी श्रीमंत शाळा आणि गरिबांसाठी गरीब शाळा असे भेदभाव करणारे धोरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अवलंबले आहे. त्यांनी सर्व पालकांची माफी मागून हे धोरण तातडीने मागे घ्यायला हवे.
- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन
-----
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार
या प्रवेश प्रक्रियेत अर्ज नोंदणीसाठी पालकांचा मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता अर्ज भरण्यासाठी आणखी आठ ते दहा दिवसांची मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत मंगळवारी (ता. ३०) याबाबत स्पष्टता होणार आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com