न्यायव्यवस्थेवरील विश्वास उतरला

न्यायव्यवस्थेवरील विश्वास उतरला

पुणे, ता. १० ः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास ११ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्ष मारेकरी म्हणून न्यायालयाने दोषी ठरविल्याने न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास प्रत्यक्षात उतरला आहे, अशी भावना डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, श्रीपाल ललवाणी, राजीव देशपांडे यांनी व्यक्त केली.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमुळे आमचे कुटुंबीय म्हणून झालेले नुकसान कशानेही भरून येऊ शकत नाही. तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या हत्येने झालेली समाज परिवर्तनाच्या चळवळीची हानी देखील न भरून येणारी आहे. काळ पुढे सरकतो आणि उपलब्ध पर्यायांमधूनच आपल्याला स्वतःचे सांत्वन करून घ्यावे लागते याची आम्हाला जाणीव आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर मनात कितीही राग असला तरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) एकाही कार्यकर्त्याने हातात दगड उचलला नाही. कारण आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असलेले आयुष्य जगायचे आहे. हा विवेकी निर्णय आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते व भारतीय नागरिक म्हणून घेतलेला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे जीवनध्येय असलेले काम पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली असे आम्ही कायमच मानत आलो आहोत. ते आम्ही निर्धाराने करीत राहू असे त्यांनी नमूद केले आहे.

उच्च न्यायालयात अपील करणार
वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची या खटल्यात निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. डॉ. दाभोलकरांचा हा खून एका दहशतवादी कटाचा भाग आहे, असे ‘सीबीआय’ने आरोपपत्रात नमूद केले आहे. या व्यापक कटामागील सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाहीत, असे ‘अंनिस’चे म्हणणे आहे.

हा लढा सुरूच राहील
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचे सूत्रधार पकडले गेले नाहीत याची खंत आहे. बहुतांश वेळेला व्यापक कटातील सूत्रधार मोकळे सुटतात आणि प्याद्यांना बळीचा बकरा बनविले जाते. त्यामुळे सूत्रधारांना पकडण्यासाठी ही लढाई आम्ही सुरूच ठेवणार आहोत. आमची सुरुवातीपासून हीच भूमिका होती की, काही लढाया आपली जबाबदारी म्हणून लढायच्या असतात. जय पराजयाच्या पलीकडे व्यापक प्रश्न पणाला लागलेले असतात. न्याय व्यवस्थेवरील विश्वास, सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या, विचार संपविण्यासाठी माणसाला संपविणे या प्रवृत्तीच्या विरोधातील हा लढा होता. जोपर्यंत ही प्रवृत्ती आहे तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com