भाजपने काँग्रेसपेक्षा तिप्पट कामे केली

भाजपने काँग्रेसपेक्षा तिप्पट कामे केली

पुणे, ता. ११ : ‘‘देशात ६० वर्षे काँग्रेसचे सरकार होते, पण त्यांनी वेळीच प्रश्‍न न सोडविल्याने समस्या गंभीर झाल्या. पण गेल्या १० वर्षांत भाजपने काँग्रेसपेक्षा तिप्पट कामे केली आहेत. देशात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केलेच; पण त्यासोबत गरिबीही कमी केली आहे. हा केवळ ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. पुण्याचा सर्वांगीण विकासासाठी मोदींच्या इंजिनासह माझे देखील इंजिन असेल. त्यामुळे जात, धर्म याचा विचार न करता भाजपला विजयी करा’’, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नातूबाग मैदानावर सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, हेमंत रासने, शैलेश टिळक, स्वरदा बापट आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘पुण्याच्या विकासासाठी स्व. गिरीश बापट, मुक्ता टिळक या दोघांनीही चांगले काम केले आहे. पुण्यातील विमानतळाचा प्रश्न सुटत नव्हता, तेव्हा बापट यांनी दिल्लीत बैठक घ्यायला लावली. त्यातून लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्‍न सुटला. आता मेट्रो आणि रिंगरोडही मार्गी लागले आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रदूषण कमी होईल.’’


पुणे, मुंबईला फायदा होणार
पुण्याच्या विमानतळाची क्षमता वाढत असल्याने बस स्थानकासारखी गर्दी होत आहे. त्यामुळे नवीन विमानतळाची गरज भासणार आहे. देशात काँग्रेसला काम करण्यासाठी ६० वर्षांची संधी मिळाली; पण त्यांनी प्रश्न समस्या सोडविल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारने देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा निर्णय घेतला. आज भारतातील कोणत्याही जिल्‍ह्यात गेल्या, तेथे चांगले रस्ते बघायला मिळतील. आता आम्ही थेट कश्मीर ते कन्याकुमारी महामार्ग तयार करत असून, त्याचा फायदा पुणे अन् मुंबईलाही होणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या की दळणवळण वाढते, रोजगार निर्माण होतो. त्यासाठी असे धोरण असणारे सरकार केंद्रात आवश्‍यक असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

काँग्रेसने ८० वेळा घटना तोडली
भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेस करत आहे, पण याच काँग्रेसने ८० वेळा घटना तोडण्याचे पाप केले आहे. घटनेच्या मूलभूत तरतुदींमध्ये कोणालाही बदल करता येत नाही. विकासावर मत मागता येत नसले की जात-धर्मात भांडणे लावली जातात. त्याकडे मी लक्ष देत नाही, कामाच्या जोरावर मी नागपूरमधून लाखो मतांनी निवडून येणार, असे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

काय केले, काय करणार?
- पुणे-संभाजीनगर मार्ग, पुणे-बंगलोर महामार्ग, नाशिकफाटा ते खेड या महामार्गाची कामे सुरु होणार.
- १२ हजार कोटी रुपयांच्या पालखी महामार्गाचे कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
- गेल्या १० वर्षांत पश्चिम महाराष्ट्रात दोन लाख कोटींची कामे केली आहेत.
- संपूर्ण महाराष्ट्रात पाच लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com