खते, बियाणे विक्रेत्यांवर 
आता भरारी पथकांचा ‘वॉच’

खते, बियाणे विक्रेत्यांवर आता भरारी पथकांचा ‘वॉच’

पुणे, ता. १ : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी आवश्‍यक रासायनिक खते आणि बी-बियाणे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने सर्व खते व बियाणे विक्रेत्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु, काही विक्रेते हे खते व बियाणांची जास्त दराने विक्री करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा भास निर्माण करतात. अशा खते व बियाणे विक्रेत्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १४ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
या भरारी पथकांच्या माध्यमातून खते व बियाणे विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जाणीवपूर्वक खते व बियाणांची टंचाई निर्माण झाल्याचा भास करून निश्‍चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त भावाने शेतकऱ्यांना खते व बियाणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची रासायनिक खतांची मागणी वाढत असते. शिवाय विविध पिकांची सुधारित वाणांची बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी खते, बी-बियाणांच्या दुकानांकडे धाव घेत असतात. परंतु अनेकदा हे विक्रेते कमी वेळेत जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने रासायनिक खते आणि बी-बियाणांची टंचाई असल्याचा भास निर्माण करण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करत असतात. यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने खते आणि बियाणे खरेदी करत असतात. याचाच फायदा उठविण्यासाठी शेतकऱ्यांना निश्‍चित किमतीपेक्षा जास्तीच्या भावाने खते आणि बियाणांची विक्री करण्याचे प्रकार घडत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य दराने खते आणि बियाणे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ही भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत.
पुणे जिल्ह्यातील तेरापैकी हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून जिल्ह्यातील एक हजार ३८० खरीप गावे आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी खरीप पिकांसाठी दोन लाख सहा हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com