काव्यलेखनांतून ‘शिवारकरी’ सामर्थ्याने आला

काव्यलेखनांतून ‘शिवारकरी’ सामर्थ्याने आला

पुणे, ता. ४ ः ‘‘र. वा. दिघे यांच्या कादंबऱ्यांतून पहिल्यांदा मराठीत वारकरी शेतकरी आला. त्याचप्रमाणे कवी केशव देशमुख यांच्या कृषिनिष्ठ समृद्ध जाणिवा असणाऱ्या काव्यलेखनांतून ‘शिवारकरी’ फार सामर्थ्याने आला,’’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
केशव देशमुख यांच्या साहित्याचा धांडोळा घेणाऱ्या डॉ. मिलिंद बागूल संपादित ‘शिवारप्रतिभा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदावरून डॉ. मोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘शेतीचा प्रश्न हा जातीचा नसून, तो मातीचा प्रश्न आहे. या मातीला धरूनच देशमुख यांनी आपली कविता सतत एका निष्ठेने लिहिलेली आहे. ही मराठीतील अर्थात महत्त्वाचीच कविता आहे. काव्यातून नैतिक मूल्याची जपणूक करण्यासह एक भाषातज्‍ज्ञ म्हणून, विचारवंत म्हणूनही त्यांची ओळख दुर्लक्षित करण्यासारखी नाही.’’
याप्रसंगी लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. तुकाराम रोंगटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, संगीता माळी, केशव देशमुख, अलका देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. रोंगटे म्हणाले, ‘‘केशव देशमुख यांनी शेतशिवारांची कविता लिहिली. ही कविता स्त्रीसंवेदना, पाणीप्रश्न अशा संवेदनशील विषयांनाही उजागर करते.’’ पिंगळे म्हणाले, ‘‘एक नितळ माणूस, एक उत्तम कवी असणाऱ्या केशव देशमुख यांनी मानवी सृष्टीसह निसर्गातील सर्व जीवसृष्टीला धरून संतांच्या कळवळ्याची महत्त्वाची कविता लिहिली.’’ सूत्रसंचालन डॉ. नागनाथ बळते यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com