कलयुगी उद्धार हरीच्या नामे...

कलयुगी उद्धार हरीच्या नामे...

पुणे, ता. ९ः ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परें पडो, मैत्र जीवांचें’... समाजातील दुष्टांचा नाश करण्यापेक्षा त्याच्यातील दृष्ट वृत्तीचा नाश करून त्याला माणूस म्हणून जगायला शिकवले पाहिजे, हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून दिलेले तत्वज्ञानाची प्रचिती येरवडा कारागृहात अनुभवण्यास मिळाली. महाराष्ट्र राज्य वारकरी आचारसंहिता परिषदेचे अध्यक्ष नीलेश महाराज झरेगावकर यांनी राज्यातील कैद्यांच्या प्रबोधनाचा ध्यास घेतला आहे. त्यातील येरवडा कारागृहात रौप्यमहोत्सवी कीर्तन सोहळ्यात स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी प्रबोधनपुष्प गुफंले.

वारकरी आचारसंहिता परिषदेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील ६० कारागृहात कीर्तनाच्या माध्यमातून कैद्यांमध्ये प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला जातो. नीलेश महाराज झरेगावकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम होत आहे. गेल्या वर्षभरात मध्य विभागातील कारागृहांमध्ये हा उपक्रम झाला. ‘सकळांसी येथे आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरीच्या नामे’ याप्रमाणे जे काही चुकीच्या निर्णयामुळे दुःखाला कारणीभूत झाले आहेत, त्यांनाही हरीनामातून बोध घेऊन जीवन सत्कर्मी लावण्याचा अधिकार संतांनी दिला आहे. दुःख आणि वेदना म्हणजे कारागृह. या नरकरुपी कारागृहात संचविचाराचा बोध देऊन त्यांच्या वृत्ती बदलावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या उपक्रमाचा रौप्यमहोत्सव पुण्यात करण्याचे नियोजन केले. स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत पुण्यातील येरवडा कारागृहात हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी कारागृहात पंचपदी म्हणण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे कार्याध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे, विठ्ठल महाराज घुले, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील धमाळ, सुनील देवधर, किसनराव गडाख आदी उपस्थित होते. या वेळी देहूतील १५० वारकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक झरेगावकर महाराज यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

...त्याच हातांनी केले व्यासपीठ
खल प्रवृत्ती घालवून सत्प्रवृत्ती वाढीस लावणाऱ्या या उपक्रमांत कीर्तन सोहळ्यासाठी स्वामी गोविंद गिरी महाराज मार्गदर्शन करणार होते. गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनीच स्वामींजींसाठी व्यासपीठ तयार केले. त्यावरूनच स्वामीजींनी मार्गदर्शन केले. या कैद्यांनी हरिनामाचा गजर केला तसेच चाळीस मिनिटे ऐकण्याची क्षमता असलेल्या कैद्यांनी भक्तीमय वातावरणात संतवचने तब्बल पाच तास ऐकून घेतली. त्यातील काही कैद्यांनी स्वागत गीत गायले तर काहींनी मृदंगवादनही केले.

श्रीरामनामाने वाल्ह्याचा वाल्मीकी ऋषी होतो तर तुम्ही नामस्मरणाने का नाही तरणार? तुमच्या हातून काही पाप झालेही असेल. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. येरवडा कारागृहात तुम्ही शिक्षा भोगल्यानंतर त्याचे पापक्षालन केले आहेच. मात्र, यापुढील आयुष्य जगताना नामस्मरणाची साथ सोडू नका. तसे केल्यास पुन्हा तुम्हाला वाममार्गाला जाण्याचा विचारही मनात येणार नाही. हरिनामातून जीवन परिवर्तन करून घेण्यातच तुमचे कल्याण आहे.
- स्वामी गोविंद गिरी महाराज

समाजात संतविचारातून प्रबोधन करून सात्त्विक विचारांचा समाज घडविण्याची जबाबदारी कीर्तनकारांची आहे. त्यामध्ये आम्ही कमी पडलो. प्रबोधनात्मक कीर्तनकार घडविण्याऐवजी ‘कमर्शिअल’ कीर्तनकार घडत आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाला गेलेल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे मी माझे कर्तव्य आहे. म्हणून कारागृहातील कैद्यांना प्रबोधनाचा उपक्रम राबवून प्रयत्न करीत आहे.
- नीलेश महाराज झरेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आचारसंहिता परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com