केवळ चार ते पाच टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

केवळ चार ते पाच टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

पुणे, ता. २ : शाळांच्या वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून, यंदा इयत्ता पाचवी आणि आठवीचे चार ते पाच टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदापासून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेऊन त्यात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती यापूर्वीच निश्‍चित केली आहे. या कार्यपद्धतीला शिक्षकांसह पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद येत असल्याचे दिसून येत आहे.
शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्‍चित केली आहे. याबाबत ७ डिसेंबर २०२३ रोजी अध्यादेशही काढण्यात आला. यात पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा घेण्यात येईल. वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. पुनर्परीक्षेतही संबंधित विद्यार्थी नापास झाल्यास, त्यांना पाचवीच्या आणि आठवीच्या वर्गातच पुन्हा बसवले जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. नुकतेच शाळांमधील वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून, पाचवी आणि आठवीच्या परीक्षेच्या निकालाचा आढावा घेतला असता, या वर्गातील शाळांमधील चार ते पाच टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे शाळांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने यंदापासून लागू केलेल्या नव्या मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत पालकही सकारात्मक असल्याचे शिक्षकांनी सांगितले.


शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी सर्व विषयांत पास असणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार शाळांनी घेतलेल्या वार्षिक परिक्षेत केवळ चार ते पाच टक्के विद्यार्थी नापास झाले असून, त्यांची पुनर्परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. त्याआधी विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. यंदा वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून आले.
- भानुदास रिठे, प्राचार्य, प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय, कोंढवा बु.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्याने, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. पालक आणि विद्यार्थीही या वर्गातील अभ्यासाला गांभीर्याने घेत असल्याचे दिसून आले. या वर्गांमधील जवळपास तीन ते चार टक्के विद्यार्थी नापास ठरले आहेत. जूनमध्ये या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येईल. त्यादृष्टीने संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन केले आहे.
- सुजित जगताप, अध्यक्ष, पुणे शहर मुख्याध्यापक संघ.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा मे महिन्यात अभ्यास घेऊन त्यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात येईल.
- नंदकुमार सागर, अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com