निष्क्रीय अधिकाऱ्यांना परत पाठवा

निष्क्रीय अधिकाऱ्यांना परत पाठवा

पुणे, ता. ११ : शहरात पाणी तुंबल्यानंतर राजकीय पक्षांकडून प्रशासनाविरोधात भूमिका घेत त्यांच्या निष्क्रीयणावर टीका केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी भाजप, शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाणी तुंबण्यावर उपाय योजना करा, आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय करा, निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. या वेळी आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर, राहुल भांडारे, सुशील मेंगडे, बापू मानकर, दीपक पवार आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत घाटे म्हणाले, ‘‘शहरात पहिल्याच पावसात नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याचे समोर आले. क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी मदत पोहचविण्यास दिरंगाई करत आहेत, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना शहराची माहिती नाही, समजून घेण्याची तयारीही नाही, त्यामुळे अशा निष्क्रीय अधिकाऱ्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यांच्या कामात सुधारणा होणार नसेल, तर त्यांना परत राज्य शासनाकडे पाठवावे. शहरामध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी करावी.’’
शिवेसनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनीही नालेसफाई, पावसाळी गटारांची स्वच्छतेची न झालेली कामे आणि शहरात पाणी तुंबल्याने आयुक्तांना निवेदन दिले. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यांना आपत्तीच्या वेळी मदत मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी, अशी मागणी भानगिरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

इतकी वर्षे कामे का करून घेता आली नाहीत?: कदम
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर टीका केली. अनेक वर्षांपासून पर्वती मतदारसंघात आंबिल ओढ्याशेजारी असणाऱ्या रहिवाशांना पुराचा धोका आहे. पण त्यात सत्ताधाऱ्यांनी सुधारणा केलेली नाही. विधानसभा निवडणूक आल्यानंतर त्यांना प्रश्‍नांची आठवण झाली आहे. इतकी वर्षे आमदार असताना कामे करून का घेता आली नाहीत, आता प्रशासनाला जाब विचारण्यापेक्षा त्यांनी कामे करून घेणे आवश्‍यक होते, अशी टीका कदम यांनी आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर केली. या वेळी नितीन कदम उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com