मराठा आरक्षणासंबंधी कायदेशीर मार्ग काढणार मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका ः सर्व पर्यायांचा विचार
पुणे, ता. १ ः मराठा आरक्षणासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत आरक्षणासंबंधी सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार झाला आहे. काही पर्याय निघाले, तर ते न्यायालयात कसे टिकतील, यावरही चर्चा झाली आहे. या प्रश्नावर कायदेशीर मार्ग तातडीने काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील उड्डाणपुलाचे तसेच मुठा नदीवरील शनिवार पेठ व जंगली महाराज रस्त्याला जोडणाऱ्या मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती मंडळ व केसरीवाडा गणपती मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी मंडळ व कोथरूड येथील साई मित्र मंडळास भेट दिली. तत्पूर्वी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये मराठा आंदोलनास काही अटी व शर्तीवर परवानगी दिली होती. प्रत्यक्षात रस्त्यावर चुकीच्या गोष्टी घडल्या. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे राज्य सरकारकडून पालन केले जाईल. हा प्रश्न सामंजस्यातून सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विखे पाटील यांनी त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. पण चर्चा नेमकी कोणाशी करायची ? माइकवर चर्चा होते का ? त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलेले आहे. त्यातून काही मार्ग निघतो का, तेही आम्ही तपासून बघत आहोत.’’
मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळलेली नाही, काही ठिकाणी बंद व ‘रास्ता रोको’ झाले. तिथे अर्ध्या तासात पोलिसांनी रस्ते खुले केले आहेत. मात्र, काही भागात घडलेल्या घटना भूषणावह नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
-------------
राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न नको
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वांनीच अशा सामाजिक प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे बंद करावे. त्यातून आपलेच तोंड पोळते. मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले, असा प्रश्न सुळे यांनी स्वतःला विचारावा. त्यावर मार्ग कोणी काढला ? त्यांच्या काळात मार्ग निघाला का ? त्यांच्या अडीच वर्षाच्या सरकारच्या कालखंडात त्यांनी एकही निर्णय मराठा समाजासाठी घेतला नाही.’’
----------------
फडणवीस म्हणाले
- पत्रकारांवरील हल्ले महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाहीत
- केंद्राकडून न्याय मिळेल, हे कायदेतज्ज्ञ नव्हे, तर शरद पवार यांचे म्हणणे.
- आरक्षणासंबंधीचा विषय केंद्राच्या नव्हे, तर राज्याच्या अखत्यारीतीलच.
- आंदोलकांनी पहिल्या दिवशी घातलेल्या धुडगुसामुळे दुकाने बंद
- पोलिस बंदोबस्तात दुकाने खुली करण्याचे आदेश
--------------
फोटोः 45677
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.