महिन्यात बसविले ३, ६०० पाण्याचे मीटर
पुणे, ता. २ : महापालिकेने सुरू केलेल्या समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळजोडाला मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. या आदेशाचा धसका घेत मीटर बसविण्यास होणारा विरोध काही प्रमाणात कमी झाल्याने गेल्या एक महिन्यात तब्बल तीन हजार ६०० मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने गुन्हे नोंदविलेले नाहीत, मात्र पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून संबंधित नागरिकास नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे महापालिका प्रशासनाकडून पाण्याचा अतिरिक्त वापर होत असल्याचे सांगत पाणी गळतीवर व पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते नदीत सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानंतर प्रशासनाने पाणी गळती रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली. त्यानुसार पाणी मीटर बसवत असताना काही ठिकाणी त्यास नागरिकांसह राजकीय व्यक्तींकडून तीव्र विरोध दर्शविला जात होता.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी पाणी मीटर बसविण्याबाबत पत्रक काढले. त्यामध्ये पाण्याचे मीटर बसविण्यास विरोध केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नळजोड तोडणे किंवा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी (कलम ३५३) गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाच्या वितरण व प्रकल्प अभियंत्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन पाण्याचे मीटर बसविण्यास सुरुवात केली. काही नागरिकांचा मीटर बसविण्यास होणारा विरोध लक्षात घेऊन त्यांना नळजोड तोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर नागरिकांकडून काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला तर, काही नागरिक अद्यापही विरोध करत असल्याचे लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत संबंधितांना समन्स पाठविण्यात आले आहे, तसेच लेखी पत्रही देण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याने गुन्हे दाखल करण्याची वेळ महापालिकेवर अद्याप आलेली नाही.
दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच १५ दिवसांत दोन हजार पाण्याचे मीटर बसविणे महापालिका प्रशासनास शक्य झाले आहे. त्यानंतरच्या १५ दिवसांत एक हजार ६०० पाण्याचे मीटर बसविण्यात आले आहेत.
घरगुती, व्यावसायिक नळजोडांना मीटर
महापालिकेकडून घरगुती नळजोडांबरोबरच व्यावसायिक नळजोडांनाही मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. पाण्याचे मीटर बसविण्याचे काम दोन कंपन्यांमार्फत केले जात आहे. महापालिकेकडून संबंधित कंपन्यांना ठेकेदार जोडून देण्यात आले आहेत. एका पथकाकडून दिवसाला ५ ते ६ पाण्याचे मीटर बसविले जात आहेत. सध्या ५० ते ६० पथके मीटर बसविण्याची कामे करत आहेत.
महापालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात पाणी मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी सुसंवाद साधत, त्यांना मीटरबाबत योग्य माहिती देऊन मीटर बसविण्यात आले. काही नागरिकांकडून विरोध होत असल्याने त्यांना समन्स बजावणे, लेखी पत्र देण्यात आले आहे.
- ललित बेंद्रे,
अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
अशी आहे स्थिती....
३ लाख १८ हजार
- शहरातील अधिकृत नळजोड
२ लाख ९० हजार
- एकूण पाणी मीटर बसविणार
१ लाख ८५ हजार
- आत्तापर्यंत बसविलेले पाणी मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.