तुकडेबंदी व्यवहारांच्या नोंदीसाठी कार्यपद्धती निश्‍चित

तुकडेबंदी व्यवहारांच्या नोंदीसाठी कार्यपद्धती निश्‍चित

Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : तुकडाबंदी कायदा रद्द केल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने झालेले व्यवहार अधिकृत करण्यासाठी कशाप्रकारे नोंदी घ्याव्यात, अशा व्यवहारांची दस्तनोंदणी कशी करावी, याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारने निश्‍चित करून दिली आहे. त्यामुळे तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार कायदेशीर होणार असल्याने अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या, परंतु मालकी हक्क नसलेल्या लाखो नागरिकांना मालकी हक्क मिळणार आहे.

राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या हद्दीमध्ये असलेला तुकडेबंदी कायदा राज्य सरकारने रद्द केला आहे. त्याबाबतची अधिसूचनासुद्धा नुकतीच काढण्यात आली. पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झालेले व्यवहार या निर्णयाने नियमित होणार आहेत, मात्र या कायद्याची अंमलबजावणी महसूल विभाग व नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने करावी, त्याची कार्यपद्धती निश्‍चित नव्हती. ती राज्य सरकारने निश्‍चित केल्याने असे व्यवहार कायदेशीर होण्याच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली आहे. त्यानुसार आता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी म्हणजेच एक-दोन गुंठे जमिनीचे खरेदीखत झाले आहे, मात्र त्याचा फेरफार झाला नाही, अशा व्यवहाराच्या नोंदी आता सातबारा उताऱ्यावर घेण्यात येणार आहेत, तसेच तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाले म्हणून ज्यांचे फेरफार रद्द करण्यात आले आहे, त्यांचे फेरफार नव्याने घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर यांनी काढले आहेत. याबाबतचे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
==========
महसूल विभागासाठीची कार्यपद्धती
- नोंदणीकृत दस्त झाला आहे, परंतु फेरफार नोंदी घेताना तुकडेबंदीमुळे तो रद्द करण्यात आला होता. तो व्यवहार आता पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. अशा व्यवहारांची नव्याने फेरफार नोंद घेण्यात येणार आहे. ती घेताना सातबारा उताऱ्यामध्ये कब्जेदार (मालकी हक्क) सदरी खरेदीदारांची नोंद होणार आहे.
- अशाच व्यवहाराची नोंद घेताना खरेदीची नावे ‘इतर हक्कात’ नोंदवून ‘तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार’ असा शेरा मारला गेला आहे. त्यांची नावे आता इतर हक्कातून काढून थेट सातबारा उताऱ्याच्या कब्जेदार सदरी घेतली जाणार आहेत.
- ज्यांनी तुकड्यांचा व्यवहार नोंदणीकृत केला आहे, पण त्यांची नोंद अजून फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर झालेली नाही. त्यांनी नोंदणीकृत दस्ताच्या प्रतीसह तहसीलदार कार्यालयात अर्ज केल्यानंतर त्या अर्जाच्या आधारावर फेरफार नोंद घेण्यात येणार आहेत.
------------
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासाठीची कार्यपद्धती
- अनोंदणीकृत (रजिस्टर न झालेल्या) दस्ताच्या आधारे एक-दोन गुंठे जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले असतील, अशा प्रकरणात महसूल अधिकारी त्यांच्या गावामध्ये नागरिकांना आवाहन करणार.
- अनोंदणीकृत व्यवहार नोंदणीकृत करण्यासाठी खरेदीदार व विक्रेते यांना दस्तनोंदणी करून घेण्यासाठी प्रवृत्त करणार.
- असे व्यवहार नोंदणीकृत करण्यास संबंधित खरेदीदार-विक्रेते पुढे आल्यास नोंदणी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ते मुद्रांक शुल्क आकारून या दस्त ऐवजाची नोंदणी करून घेणार.
- अशा दस्तांची नोंदणी झाल्यानंतर ते फेरफार घेण्याकरिता ऑनलाइन पाठवणार. संबंधित महसूल अधिकारी या दस्तानुसार खरेदीदारांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर विनाविलंब घेणार
----------
या ठिकाणचे व्यवहार होणार नियमित
राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या हद्दीमध्ये तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही, तसेच प्राधिकरण व प्रादेशिक आराखडा लागू असेल, अशा हद्दीत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी असलेल्या क्षेत्रात असलेल्या जमिनी, तसेच गावांच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही. या भागात पूर्वी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार विनाशुल्क नियमित होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com