सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार

सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार

Published on

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १७ : राज्यातील विविध समाजातील विद्यार्थिहितासाठी कार्यरत असलेल्या ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘आर्टी’, ‘टीआरटीआय’ आणि ‘महाज्योती’ यांसारख्या स्वायत्त संस्थांच्या ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. या संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी)-२०२५साठी विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेले परीक्षा केंद्र न देता, ३०० ते ४०० किलोमीटर दूर असलेली परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आमच्या भविष्याशी खेळ चाललेला असल्याची संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी), ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी), आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) आणि ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या संस्थांतर्फे विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस आणि एसएससी यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य दिले जाते. यासाठी ‘सीईटी’ परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या संस्थांनी १६ ते २७ सप्टेंबर दरम्यान सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये परीक्षा केंद्र त्यांच्या पसंतीनुसार नसल्याचे उघड झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना साधारण ४०० किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या जिल्ह्यांत परीक्षेसाठी जाण्यास भाग पडत आहे.
याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एक विद्यार्थी म्हणाला, ‘‘एका विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त परीक्षेसाठी अर्ज केला आहे. या परीक्षा लागोपाठ असल्याने विद्यार्थ्यांना वारंवार प्रवास करणे शक्य नाही. पुण्याच्या अनेक विद्यार्थ्यांना नागपूर किंवा अमरावतीसारख्या दूरच्या शहरांमध्ये परीक्षाकेंद्र निश्चित झाल्याने त्यांना साधारण ६०० किलोमीटरचा प्रवास करत जावे लागत आहे.’’

कोणती परीक्षा द्यायची हा प्रश्न
सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थांची निवडचाचणी परीक्षा १५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आहे. मात्र त्याच दरम्यान २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी गट ‘क’ मुख्य परीक्षा नियोजित आहे. त्यामुळे या संस्थांच्या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आता नेमकी कोणती परीक्षा द्यायची, हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि योग्य नियोजन करून परीक्षा पुन्हा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अशी आहे स्थिती
सीईटी ही परीक्षा १६ ते २७ सप्टेंबर दरम्यान राज्यातील ३० शहरांमध्ये असलेल्या ९४ केंद्रांवर घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी एकूण ४ लाख २९ हजार ३८९ उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी दिलेल्या निवडीनुसार त्यांना परीक्षाकेंद्र वाटप करण्यात आली आहेत. ९७.४० टक्के उमेदवारांना त्यांच्या पहिल्या ते पाचव्या क्रमांकाचे पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे. तथापि उर्वरित उमेदवारांना म्हणजेच २.६० टक्के उमेदवारांना पहिली पसंती दिलेल्या ठिकाणाच्या नजीकच्या जिल्ह्यामधील परीक्षा केंद्र वाटप करण्यात आले आहे.

बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या हिताचा विचार करून परीक्षा केंद्र त्यांच्या पसंतीनुसार देण्यात यावे.
- शिवा बारोळे, परीक्षार्थी

या संस्थांच्या अनागोंदी कारभारामुळे एमपीएससी आणि निवड चाचणी परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. तसेच ८० टक्के विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांच्या पसंतीनुसार आलेले नाहीत. त्यामुळे या संस्थांनी तातडीने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

- महेश राहणे, परीक्षार्थी

ज्या विद्यार्थ्यांना या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी सारथीकडे तक्रार केली आहे. त्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सारथीतर्फे करण्यात येत आहे. ‘बार्टी’तर्फे या परीक्षांचे नियोजन करण्यात येत असल्याने त्यांच्यापर्यंत या अडचणी पोचविण्यात आल्या आहेत.
- वरिष्ठ अधिकारी, सारथी

या सर्व परीक्षांसाठी तब्बल चार लाख २९ हजार ३८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अतिशय अल्प विद्यार्थ्यांनाच गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तरीही आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शक्य त्या सर्व उपाययोजना करत आहोत. २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेचा विचार करून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आणि न्याय्य निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
- सुनील वारे, महासंचालक, बार्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com