धनादेश वटविण्याच्या नव्या नियमामुळे संभ्रम
पुणे, ता. ७ : रिझर्व्ह बँकेने एकाच दिवसात धनादेश वटविण्याची प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील बँकिंग क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. या नव्या नियमामुळे अनेक बँकांमध्ये धनादेश वटविण्याची प्रक्रिया विस्कळित झाली असून अनेक खातेदारांची रक्कम वेळेत जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वी धनादेश वटविण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत. मात्र, नवीन नियमानुसार धनादेश ज्या दिवशी जमा होईल, त्याच दिवशी तो क्लिअर होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक बँकेच्या शाखेला रात्री बारानंतर सर्व धनादेश स्कॅन करून क्लिअरिंग हाउसमध्ये पाठवावे लागत आहेत. या नव्या प्रणालीसाठी पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने आणि तांत्रिक साधनांची कमतरता असल्याने अनेक बँकांचे अंतर्गत नियोजन कोलमडले आहे. अनेक बँकांच्या शाखांमध्ये कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबून धनादेश स्कॅनिंग आणि अपलोड करण्याचे काम करत आहेत.
याबाबत एका बँक अधिकाऱ्याने सांगितले की, दररोज हजारो धनादेशांची प्रक्रिया करणे ही मोठी जबाबदारी आहे. आधी दोन दिवसांचा अवधी मिळत होता. मात्र, आता सर्व प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करावी लागते. नेटवर्क किंवा सर्व्हर डाऊन असल्यास मोठा गोंधळ होतो.
खातेदार चिंतेत
अनेक बँकांचे धनादेश जमा करूनही रक्कम खात्यात परावर्तित न झाल्याने खातेदारांनी मंगळवारी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. काहींनी बँकेच्या शाखांमध्ये जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली, तर काहींनी आर्थिक व्यवहार अडकले असल्याची तक्रार केली.
नवीन नियम काय सांगतो?
रिझर्व्ह बँकेने डिजिटल प्रक्रियेला गती देण्यासाठी एकाच दिवशी धनादेश वटविण्याचा नियम लागू केला आहे. त्यानुसार, धनादेश सकाळी जमा झाल्यास तो संध्याकाळपर्यंत क्लिअर व्हावा. धनादेशाचा फोटो रात्रीपर्यंत क्लिअरिंग हाउसमध्ये पाठवावा. तांत्रिक त्रुटी किंवा अपूर्ण माहिती असल्यास बँकांना दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
एकाच दिवसात धनादेश वटविण्याचा निर्णय डिजिटल कार्यक्षमतेच्या दृष्टीने योग्य असला तरी त्यासाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ तयार नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकांना काहीवेळ देणे गरजेचे आहे. तसे न झाल्याने गोंधळ निर्माण झाला असून त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागत आहे.
- ममता जोशी, बँक खातेधारक
धनादेश वटविण्याची प्रक्रिया हळूहळू सुरळीत होत आहे. सध्या धनादेशाचे फोटो रात्री उशिरा येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत बँकेत थांबावे लागत आहे. नवीन प्रणाली तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम झाल्यानंतर गोंधळ होणार नाही, असे वाटते.
- विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.