कायदा काय सांगतो ?
प्रश्न : आमचा विवाह दोन वर्षांपूर्वी झालेला आहे. परंतु माझे पती विवाह नोंदणी करण्यास सतत नकार देतात, तर असा विवाह जो नोंदणीकृत झालेला नाही. तो कायदेशीर असतो का?
उत्तर : विवाह कायदेशीर होण्यासाठी विवाह नोंदणी हे गरजेचे नाही. विवाह नोंदणीकृत नसेल तरीदेखील तो कायदेशीरच मानला जातो, यासाठी तुमच्याकडे विवाहाच्या विधींमध्ये फोटो असणे गरजेचे आहे.
प्रश्न : आमचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये झालेला आहे. माझी पत्नी केवळ चारच दिवस माझ्याबरोबर राहिली व लगेचच काहीही कारण नसताना माहेरी निघून गेली. आम्ही वारंवार तिला फोन, मेसेजद्वारे बोलावले, तिच्या घरी जाऊन भेटलो, परंतु कोणतेही ठोस कारण ती देत नाही व नांदायलाही येत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करता येईल.
उत्तर : अशा परिस्थितीत दोन पर्याय आहेत. ते म्हणजे झालेले लग्न टिकवून ठेवणे किंवा घटस्फोट घेणे. तुम्हाला जर का पत्नीला नोंदवायचे असेल तर तुम्ही कौटुंबिक कोर्टामध्ये तत्काळ तसा अर्ज करू शकता. परंतु लक्षात घेणे गरजेचे आहे की अशा वेळेस जरी चारच दिवस पत्नी राहिली असेल तरीही तिला पोटगी मागण्याचा हक्क आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही विवाहाला एक वर्ष झाल्यानंतर घटस्फोटाचा दावा दाखल करू शकता.
प्रश्न : कोर्टामध्ये आमचे घटस्फोटाचे प्रकरण चालू आहे. त्यात मला वीस हजार रुपये दरमहा पत्नीला पोटगीसाठी द्यावे, अशा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. परंतु सतत न्यायालयाच्या तारखा व झालेला मानसिक त्रास यामुळे माझी नोकरी गेली आहे व मी एवढी रक्कम पत्नीला पोटगी म्हणून देऊ शकत नाही, तर मला काय पर्याय आहे?
उत्तर : सर्वप्रथम न्यायालयीन प्रक्रियेची स्वतःदेखील माहिती घेतल्यास व आपल्या वकिलांची मनमोकळेपणाने बोलल्यास कोर्ट केसची भीती कमी होते व कोर्टामध्ये काय चालले आहे हे समजायला लागते. वकिलांशी योग्य तो संवाद साधा. तुमची नोकरी गेली असल्यास त्यासंदर्भातली कागदपत्रे कोर्टात सादर करा व पोटगीची रक्कम कमी करण्यासाठी अर्ज करा. कोर्ट हे नक्कीच तुमची बाजू ऐकून घेईल. कायद्याची भूमिका तटस्थ आहे व तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल.
प्रश्न : माझ्या पत्नीने माझ्यावर कौटुंबिक हिंसाचाराची खोटी केस केलेली आहे. त्यात आमच्या गावाकडे राहणाऱ्या वहिनीचे नाव व माझ्या आई-वडिलांचे नाव घेतले आहे, त्यांनाही कोर्टाने नोटीस पाठवली आहे. ते कधीही आमच्या सोबत राहिले नव्हते, त्यांना अकारण त्रास होत आहे, तर काय केले पाहिजे?
उत्तर : जर तुम्ही व तुमची पत्नीच राहत होता व तुमचे नातेवाईक तुमच्याबरोबर कधीही राहिले नाहीत तर या नातेवाइकांच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस करता येत नाही. परंतु, यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये अर्ज करावा लागेल. हे नातेवाईक वेगळीकडे राहतात त्यांचा कागदोपत्री पुरावा दाखल करावा लागेल, पुरावे बघितल्यानंतर कोर्ट अशा नातेवाइकांची नावे केसमधून काढून टाकू शकते. घाबरून न जाता योग्य त्या कायद्यांचे ज्ञान घेणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.