मतचोरीचे पुरावे सादर केल्याने जिवाला धोका

मतचोरीचे पुरावे सादर केल्याने जिवाला धोका

Published on

पुणे, ता. १३ ः लोकसभा निवडणुकीतील मतचोरीचे पुरावे सादर केल्याने; तसेच तक्रारदार सात्यकी सावरकर हे महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांचे वंशज असल्याने आपल्या जिवाला धोका आहे, असा अर्ज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी बुधवारी येथील विशेष न्यायालयात केला.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. त्यात राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल करत आपल्या जिवाला धोका असल्याचे नमूद केले. दरम्यान हा अर्ज उद्या (ता. १४) मागे घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या राजकीय पार्श्‍वभूमीवर संभाव्य धोके विचारात घेता त्याची न्यायालयाने नोंद घ्यावी या उद्देशाने हा अर्ज करण्यात आला आहे, असे ॲड. मिलिंद पवार यांनी स्पष्ट केले.

अर्जात काय नमूद आहे?
‘तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी २९ जुलै २०२५ त्यांच्या लेखी निवेदनात ते महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे, गोपाल गोडसे यांचे मातृवंशीय वंशज असल्याचे स्पष्ट केले आहे. सत्य, अहिंसा आणि धर्मनिरपेक्षेतेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा गांधींच्या हत्येत तक्रारदारांच्या पूर्वजांचा थेट सहभाग हे निर्विवाद ऐतिहासिक तथ्य आहे. राहुल गांधी सुद्धा सत्य, अहिंसा, दुर्बलांची सेवा आणि घटनात्मक मार्गानेच राजकारण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी इतर विरोधी पक्ष नेत्यांसह ११ ऑगस्टला ‘व्होट चोर सरकार’ अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. राहुल गांधी यांनी निवडणुकीतील अनियमिततेचे पुरावे सादर करत निवडणूक आयोगालाच थेट लक्ष्य केले होते. तक्रारदाराच्या वंशाशी संबंधित हिंसक आणि संविधानविरोधी प्रवृत्तींच्या नोंदी; तसेच सध्याच्या राजकीय वातावरणाचा विचार करता राहुल गांधींना शारीरिक इजा होण्याचा, त्यांच्यावर खोटे आरोप किंवा लक्ष्य करण्याचा आणि इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा गंभीर धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रतिबंधात्मक संरक्षण देणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे, असे या अर्जात नमूद आहे.

भाजप नेत्यांच्या धमक्यांचा उल्लेख
राहुल गांधी यांच्या संसदीय भाषणातील वक्तव्यांवर आक्षेप घेत त्यांनी हिंदू समाजाचा अपमान झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केला होता. केंद्रीय मंत्री रवीनेत सिंह बिट्टू यांनी राहुल गांधींना ‘देशाचे नंबर वन दहशतवादी’ म्हटले होते, तर भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधींना हत्येची धमकी दिली होती,’ असेही राहुल गांधी यांच्या अर्जात नमूद आहे.

पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला
विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद भूषविणाऱ्या राहुल गांधी यांनी न्यायालयात खोटे विधान करून न्यायालयाचा अवमान आणि शपथभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, असा अर्ज सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी बुधवारी विशेष न्यायालयात केला. या प्रकरणावर ११ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com