सहकारी चळवळीला सुरुंग 
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची खंत

सहकारी चळवळीला सुरुंग माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची खंत

Published on

पुणे, ता. १६ ः साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. मात्र, महाराष्ट्रात दिवसेंदिवस सहकारी चळवळीला सुरुंग लागण्यास सुरवात झाली आहे. सहकार दूर होण्यास लागला आहे. खासगी कारखान्यांना कामगारांची आस्था राहिलेली नाही.’’ अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
साथी किशोर पवार जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘साखर उद्योग व कामगार चळवळ - अनुभव व दृष्टी’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साथी किशोर पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, प्रतिष्ठानच्या सचिव वंदना पवार, उपाध्यक्ष अंकुश काकडे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘एकेकाळी खासगी कारखाने होते पण ते महाराष्ट्रातील लोकांचे होते. आता तसे चित्र दिसत नाही. राज्यातील खासगी कारखाने राज्याबाहेरील लोकांचे असल्याने त्यांना स्थानिकांशी आस्था नाही. त्यातच या कारखान्यांची गाळपक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कमी क्षमतेचे सहकारी कारखाने टिकणे अवघड झाले आहे. या खासगी कारखान्यांनी कामगारांची संख्यादेखील कमी केल्याने सहकारी कारखाने त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने गाळप क्षमतेबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघ, राज्य सरकार यांच्यात चर्चा घडवून याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे.’’
किशोर पवार यांच्या कामाचा उल्लेख करताना पवार म्हणाले, ‘‘पूर्वी साखर कामगार संघटना चर्चेसाठी आल्यानंतर कामगारांच्या पदरात जास्तीतजास्त पाडून घेण्याची त्यांची भूमिका असायची. मात्र, बैठकीनंतर कारखानदार संघटनेचे नेते यांच्यात सख्य असायचे. त्यांनी कायमच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला.’’ किरण ठाकूर, तात्यासाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले.

पवार म्हणाले...
- सहकारी कारखाने दिवसेंदिवस कमी होत आहेत.
- खासगी कारखान्यांमध्ये कमीतकमी कामगारांमध्ये काम करण्याची प्रथा सुरू झाली आहे.
- कारखान्यात घाम गाळणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे काय, याचा विचार करावा लागेल.
- खासगी कारखान्यांचे स्वरूप बदलले आहे.
- खासगी कारखान्यांचे प्रस्थ वाढत असून, ते पाहून अस्वस्थता वाढत आहे.

तरुणाईचा ओढा धार्मिकतेकडे...
पूर्वी बहुतांश तरुण डाव्या विचारांचे असायचे. दुर्दैवाने या कालखंडात तरुणांच्या विचारांना शहकाटशह दिला जात आहे. त्यांच्यात धार्मिक ओढ जास्त दिसून येत आहे. लोकशाही दिली पण आपण तिला जपण्यासाठी कमी पडतो की काय? पन्नास पुढील वयोगटातील लोकांनीच पुढाकार घ्यायचा का? तरुण पिढी यात का येत नाही, याचे उत्तरे शोधली पाहिजेत, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
फोटोः 40396

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com