...तर भरावे लागणार सात टक्के मुद्रांक शुल्क

...तर भरावे लागणार सात टक्के मुद्रांक शुल्क

Published on

पुणे, ता. २५ : तुकडाबंदी कायदा रद्द केल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने झालेले व्यवहार अधिकृत करण्यासाठीची कार्यपद्धती राज्य सरकारने निश्‍चित करून दिली आहे. परंतु या कार्यपद्धतीनुसार अशा व्यवहारांची दस्तनोंदणी पूर्वी झाली असेल, तर त्यांची फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर नोंदणी विनाशुल्क होणार आहे, मात्र दस्त नोंदणी झाली नसेल तर ती करून घेण्यासाठी नियमानुसार रेडीरेकनरमधील जमीन दराच्या सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या हद्दीमध्ये असलेला तुकडाबंदी कायदा राज्य सरकारने रद्द केला आहे. त्याबाबतची अधिसूचनासुद्धा नुकतीच काढण्यात आली. या निर्णयामुळे पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार नियमित होणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने महसूल विभाग व नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने करावी, यांची कार्यपद्धतीही निश्‍चित करून दिली आहे. त्यानुसार आता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी म्हणजेच एक-दोन गुंठे जमिनीचे खरेदीखत झाले आहे. मात्र त्याचा फेरफार झाला नाही, अशा व्यवहाराच्या नोंदी आता सातबारा उताऱ्यावर विनाशुल्क घेण्यात येणार आहे. तसेच तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाले म्हणून ज्यांचे फेरफार रद्द करण्यात आले आहे, त्यांचे फेरफार नव्याने घेण्यात येणार आहेत. परंतु तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून एक, दोन गुंठ्यांचे व्यवहार झाले आहेत. परंतु त्यांची दस्तनोंदणी केली नाही. तर त्यांना दस्तनोंदणी करून घ्यावी लागणार आहे. ही दस्तनोंदणी करताना सरकारकडून कोणतीही शुल्क माफी देण्यात आली नाही. त्यामुळे दस्तनोंदणीच्या वेळेस नियमानुसार चालू वर्षीच्या रेडीरेकनरमध्ये त्या जागेचा जो दर दर्शविण्यात आला आहे, त्या दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का मेट्रो सेस आणि एक टक्का एलबीटी असे सात टक्के शुल्क भरावे लागणार आहे. याव्यतिरिक्त तीस हजार नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतरच दस्तनोंदणी होणार आहे. ती झाल्यानंतर फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर नोंदी घातल्या जाणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

हे उदाहरण बघा...
धायरी येथे २०२४ पूर्वी एक गुंठा जागा विकत घेतली आहे. तुकडाबंदी कायद्यामुळे त्यांची दस्तनोंदणी होऊ शकली नसेल व आता तुम्हाला दस्तनोंदणी करून घ्यावयाची असेल, तर त्यासाठी चालू वर्षीच्या रेडीरेकनरमध्ये त्या जागेचे मूल्य पंधरा लाख रुपये प्रती गुंठा असेल, त्यावर सात टक्के म्हणजे एक लाख पाच हजार रुपये मुद्रांक शुल्क अधिक तीस हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणजे एक लाख ३५ हजार रुपये शुल्क भरून दस्तनोंदणी करून घ्यावी लागणार आहे. तसेच विक्री देणारा व खरेदी घेणारा या दोघांना दस्तनोंदणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. त्यानंतरच जमिनीवर खरेदीदाराचे नाव विनाशुल्क लागणार आहे. जर दस्तनोंदणी पूर्वीच केली असेल, तर त्यांना केवळ फेरफार व सातबारा उताऱ्यावर नावे लावण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com