‘शहरी नक्षली’चे शिक्के मारण्याची फॅशन

‘शहरी नक्षली’चे शिक्के मारण्याची फॅशन

Published on

पुणे, ता. ३ ः ‘‘पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी झाल्यासंदर्भात दोन संस्थांची नावे पुढे आली आहेत. त्यातील एक ‘लोकायत’ ही संस्था आहे. या संस्थेकडून अनेक चांगली कामे केली जात आहेत. ही संस्था नक्षली नाही, तर श्यामसुंदर सोन्नर हे अनेक वर्षांपासून चांगले काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केली.
पुण्यात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी होत असल्याचा आरोप होत आहे. यासंबंधीच्या प्रश्‍नावर पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘सध्या एक फॅशन झाली आहे, तुम्हाला जर एखाद्याचे काम मंजूर नसेल तर तो नक्षली आहे म्हणून सांगायचे. राज्य सरकारकडून विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचे शिक्के मारले जात असून, त्यांच्या कामाचा प्रभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही चांगले काम करणाऱ्या अनेकांना नक्षली ठरवून तुरुंगात दाखल केले. मात्र न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने आला. त्यामुळे यासंदर्भात जनमत करावे लागेल.’’

पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मेळाव्यात सहभाग नाही
हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केल्यानंतर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा शनिवारी (५ जुलै) मुंबईमध्ये मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होण्यासंदर्भातही पवार यांनी भूमिका मांडली. ‘‘यासंदर्भात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी भूमिका जाहीर केली आहे. हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनाला पक्षाने पाठिंबा दिला होता. सहभागासंदर्भात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्षांचा आदेश मी मानतो. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी या मेळाव्यात सहभागी होणार नाही,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

...तर राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ
राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे या मार्गाची आवश्यकता आहे का, या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी चांगले रस्ते केले आहेत. या परिस्थितीत एक चांगला रस्ता असताना दुसरा रस्ता कशासाठी, हा प्रश्‍न आहे. शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. तर या रस्त्याची आवश्यकता का आहे, हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून समजून घेतले जाईल. शक्तिपीठाची आवश्यकता असेल तर त्याला पाठिंबा दिला जाईल. अन्यथा राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन दिले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com