कोंढव्यातील बलात्कारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमावी ः डॉ. नीलम गोऱ्हे

कोंढव्यातील बलात्कारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमावी ः डॉ. नीलम गोऱ्हे

Published on

पुणे, ता. ३ : कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करावी. त्यासाठी तत्काळ विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात याप्रकरणी विशेष तपास पथकाची तत्काळ स्थापना करावी, आरोपीला तातडीने अटक करावी, गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करावा, आरोपीवर न्यायालयात लवकर आरोपपत्र दाखल करावे, या घटनेनंतर सोसायटीमधील सुरक्षाव्यवस्थेच्या त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या आहेत, सुरक्षारक्षक- रजिस्टर नोंदी व प्रवेश नियंत्रण यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पोलिस प्रशासनाने ‘सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे’ तयार करून सर्व सोसायट्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशीही सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

ही घटना संपूर्ण शहरातील महिलांच्या सुरक्षेला गालबोट लावणारी आहे. अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा बसावा, यासाठी पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी. गृहनिर्माण सोसायट्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, तसेच नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे.
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

आरोपीला फाशी द्या
कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा राजकीय पक्ष आणि संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपीला फाशी अथवा आजन्म कारावासाची शिक्षा द्यावी, अशी मागणी हडपसर येथील शिवसेना महिला आघाडीने केली आहे.
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात अशा घटना घडतात, ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. या घटनेने विकृतीचा कळस गाठला असून महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून आरोपीला कठोर शिक्षा करावी. आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा हडपसर महिला आघाडीने दिला आहे.

जबाबदार कोण?
केंद्र आणि राज्यातील सरकारच्या अवकृपेने पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था अक्षरशः रामभरोसे झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून त्याला कोण जबाबदार आहे. शहरातील महिला स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत, हे दाहक वास्तव आहे. नागरिकांनी आता सरकारच्या भरवशावर न राहता स्वतःच्या सुरक्षेची व्यवस्था स्वतःच करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com