मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरही दिसू शकते कमी
पुणे, ता. १६ : पुण्यातील ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक रमेश जगताप (नाव बदललेले) यांची डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. दोन वर्षानंतर त्यांना पुन्हा अंधूक दिसायला लागले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली असताना पुन्हा दिसायला का कमी आले असा प्रश्न त्यांच्या मनात येत होता. नेत्ररोगतज्ज्ञाला दाखविल्यावर त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या वेळी डोळ्यांत टाकलेल्या भिंगाच्या(लेन्स) मागे जाळी आल्याचे निदान झाले. लेजर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दृष्टी सुधारली व त्यांचा जीव भांड्यात पडला.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊनही सहा महिने ते दोन वर्षांमध्ये पुन्हा डोळ्यांनी अंधूक दिसण्याची शक्यता असते. त्याचे कारण हे मोतीबिंदूच्या वेळी डोळ्यांत टाकलेल्या लेन्सच्या मागे जाळी येणे हे असू शकते. वैद्यकीय भाषेत त्याला ‘पोस्टेरियर कॅप्सुलर ओपॅसिफिकेशन’ असे म्हणतात. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने त्यांना याचे नेमके कारण समजत नाही. त्यामुळे, आताच त्यांच्या मनात झालेल्या शस्त्रक्रियेबाबत विविध प्रश्न तयार होतात. तर काही त्याबाबत दुर्लक्ष करतात. परंतु, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या एकूण रुग्णांपैकी दोन टक्के रुग्णांमध्ये ही समस्या निर्माण होत असल्याची माहिती नेत्ररोगतज्ज्ञ देतात.
ही आहेत कारणे?
‘पोस्टेरियर कॅप्सुलर ओपॅसिफिकेशन’ होण्यास विविध कारणे आहेत. त्यामध्ये लेन्सची गुणवत्ता व तिचा आकार, मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांना होणारा संसर्ग ही कारणे प्रामुख्याने दिसून येतात. तसेच, मोतीबिंदू शस्त्रक्रिया कशी झाली, शस्त्रक्रिया पश्चात घेतली जाणारी काळजी यावर डोळ्यांमधील जाळी येण्याची शक्यता वाढते. अनेकवेळा याबाबत रुग्णालाच माहिती नसते. त्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञाकडे नियमित तपासणी करायला हवी.
पाच मिनिटांत समस्या दूर
पूर्वी ही जाळी काढण्याची शस्त्रक्रिया ही अधिक गुंतागुंतीची होती. त्यामध्ये लेन्स काढून ती स्वच्छ करावी लागायची. मात्र, आता यावर अगदी पाच मिनिटांत लेजर प्रक्रिया होते व रुग्णाची ही जाळी दूर करता येते. यामध्ये रुग्णाला कोणताही त्रास होत नाही, की भूलही द्यावी लागत नाही.
जशी आरशावर धुळ साचते तशाच प्रकारची धुळ किंवा जाळी लेन्सवर जमा झाल्याने रुग्णाला दिसायला कमी होते. परंतु, ‘याग लेजर’ प्रक्रियेने ही समस्या पाच मिनिटांत दूर करता येते. जर मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी दिसायला कमी आले तर नेत्ररोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. हे होण्याचे वेगवेगळे कारणे असून रुग्णाने डोळ्यांचा संसर्ग झाल्यास दुर्लक्ष न करता उपचार घ्यावेत.
- डॉ. अनिल दुधभाते, नेत्ररोगतज्ज्ञ व रेटिनातज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.