लग्नानंतर वर्षाच्या आत न्यायालयात जाणाऱ्याला दणका
पुणे, ता. ८ : लग्नानंतर एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. घटस्फोटसाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश बी. डी. कदम यांनी फेटाळला आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम १४ नुसार विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोटासाठी दावा दाखल करता येत नाही. ही बाब पत्नीच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सुनावणी सुरू करण्यापूर्वीच न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळला.
या प्रकरणातील पती सूरज हा ३३ वर्षांचा असून, शासकीय नोकरीत उच्च पदावर आहे तर पत्नी संध्या (नावे बदललेली) ३० वर्षांची असून, खासगी कंपनीत नोकरी करते. सप्टेंबर २०२४ मध्ये दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे सुरजने हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटासाठी अर्ज केला. यास पत्नीचे वकील पुष्कर पाटील, प्रणव मते आणि अमित केंद्रे यांनी विरोध केला. कलम १४ हे विवाहसंस्थेच्या रक्षणासाठी आहे. घटस्फोटासाठी पात्र ठरण्यासाठी विवाहास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा विवाहानंतर पती-पत्नींच्या छोट्या मतभेदांवरून स्थायीत्व गमावून वैवाहिक नाते मोडण्याची शक्यता असते. याच कारणासाठी कायद्यात हे कलम आहे, असा युक्तिवाद अॅड. पाटील आणि अॅड. मते यांनी केला.
दावा ग्राह्य धरता येणार नाही
या युक्तिवादावर विचार करताना न्यायालयाने नमूद केले की, ‘‘कलम १४ नुसार विवाहास एक वर्ष पूर्ण होण्याआधी दाखल झालेली याचिका कायद्यानेच निष्क्रिय मानली जाते. त्यामुळे या दाव्यास कायदेशीर आधार नसल्याने तो ग्राह्य धरता येणार नाही. त्या अनुसार, न्यायालयाने अर्ज फेटाळला.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.