
पुणे, ता. २७ ः ‘‘काकासाहेब चितळे यांनी कृष्णाकाठी असलेल्या भिलवडीसारख्या ठिकाणी गोकूळ निर्माण केले. भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाप्रमाणे अनासक्ती मनात ठेवून, त्यांनी आयुष्यभर कार्य केले. काकासाहेब हे खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी होते.’’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ व्याख्याते डॉ. शंकर अभ्यंकर यांनी काढले.
वसुंधरा काशीकर लिखित आणि सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘काकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे’ या दत्तात्रेय ऊर्फ काकासाहेब चितळे यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन रविवारी डॉ. अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. काकासाहेब चितळे फाउंडेशन आणि सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, काकासाहेब चितळे यांच्या पत्नी सुनीता चितळे, पुत्र गिरीश चितळे, मकरंद चितळे यांच्यासह वीणा सहस्रबुद्धे, शेखर सहस्रबुद्धे, श्रीपाद चितळे, श्रीकृष्ण चितळे, भक्ती चितळे, लीना चितळे आदी चितळे कुटुंबातील सदस्य, पुस्तकाच्या लेखिका वसुंधरा काशीकर, सकाळ प्रकाशनाचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर आदी उपस्थित होते.
अभ्यंकर म्हणाले, ‘‘चितळे यांनी दूरदृष्टी ठेवून व्यवसायात अनेक प्रयोग केले. मराठी मनुष्य व्यवसायात पडत नाही आणि पडला तरी ‘पडतो’, हा अपसमज समूळ खोडून काढण्याचे काम चितळे कुटुंबाने केले आहे. त्यामुळे ‘चितळे’ या नावाबद्दल प्रत्येक मराठीला माणसाला आस्था आहे. चितळे कुटुंबीयांनी आपला व्यवसाय मोठा केलाच; मात्र आपल्याबरोबरच्या समाजालाही त्यांनी मोठे केले.’’
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘ नीतिमत्ता, गुणवत्ता आणि ग्राहक हित, या तीन वैशिष्ट्यांमध्ये चितळे कुटुंबाच्या यशाचे गमक सामावले आहे. काकासाहेब चितळे हे उद्योजकांसाठी आदर्श आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांमधून समाजाचे चारित्र्य घडत असते, त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचे आहे.’’
‘‘करुणेला व्यवहाराची झालर लावून लोककल्याण साधता येऊ शकते, याची जाणीव या पुस्तकातून वाचकांना नक्कीच होईल. या पुस्तकातून आपल्याला जगण्याचे प्रयोजन सापडेल. हे पुस्तक लिहिताना माझ्या जाणिवांचा विस्तार झाला.’’ अशी भावना लेखिका काशीकर यांनी व्यक्त केली. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मंजूषा पाटील-कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली.
----
उलगडले सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व
काकासाहेब चितळे यांनी दुग्ध व्यवसाय, पशुपालन, शिक्षण, सहकार, वाचनसंस्कृती, ग्रामीण उद्योग, शेतीमाल निर्यात, सामाजिक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेकविध क्षेत्रात चतुरस्र योगदान केले. शिस्त, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपत समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम केले. त्यांचे हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व विविध वक्त्यांच्या मनोगतातून उलगडले.
----
‘‘हे पुस्तक म्हणजे केवळ एक चरित्र नाही, तर ही एक जीवनदृष्टी आहे, असे मी मानतो. सामान्य आयुष्य जगलेल्या असामान्य माणसाचे असंख्य पैलू शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकातून केला आहे. काकासाहेब चितळे हे केवळ एका उद्योग समूहाचे प्रमुख नाहीत; तर ते विशिष्ट मूल्यविचार पद्धतीचे प्रतिनिधी आहेत.
-गिरीश चितळे, काकासाहेब चितळे यांचे पुत्र
फोटोः 34974
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.