
पुणे, ता. ३० ः ‘‘कालगणनेचा अभ्यास दुर्लक्षित राहिल्याने गेल्या ७० वर्षांमध्ये, रामायण महाभारतानंतर झाले किंवा आर्य आक्रमण सिद्धांत, असा चुकीचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकविला गेला. त्यामुळे इतिहासाचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्लेखन करून ते जगापुढे मांडण्याची आवश्यकता आहे.’’ असे मत खगोलशास्त्राचे अभ्यासक नीलेश ओक यांनी व्यक्त केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘आकार’ शाखेतर्फे नऱ्हे येथील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे ओक यांचे ‘कालगणनेचे महत्त्व भारतीय इतिहासाचे वैज्ञानिक पुनर्लेखन’ आणि ‘रामायण-महाभारताचे खगोलशास्त्रीय आकलन’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या डॉ. गरिमा भल्ला, व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली सहस्रबुद्धे, डॉ. धनंजय भंडारी, महिलाश्रम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे उपस्थित होते.
ओक म्हणाले, ‘‘भारताचा इतिहास अभिमानास्पद आहे. जगापुढे आपली प्रतिमा मोठी होण्यासाठी मुद्दाम कपोलकल्पित इतिहास लिहिण्याची आपल्याला आवश्यकता नाही. अमेरिकेला ती होती. त्यामुळे सामान्य अमेरिकन व्यक्तीला अमेरिका जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे वाटत असते’’
कोपर्निकसच्या चारशे वर्षाआधी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सूर्य स्थिर असल्याचा उल्लेख केवळ एका दृष्टांतासाठी केला होता, असे त्यांनी सांगितले. तसेच महाभारताचे युद्ध ख्रिस्तपूर्व ५५६१ मध्ये म्हणजेच सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वी झाले. रामायण हे त्यापूर्वी सात हजार वर्षे झाल्याचेही स्पष्ट पुरावे आपल्याला मिळतात. यासोबतच रामायण काळापूर्वी ऋग्वेद, नक्षत्र आधारावर कालमापन पद्धती आदी गोष्टींचे पुरावेसुद्धा खगोलशास्त्रीय संदर्भांच्या आधारे सापडतात, असेही त्यांनी सांगितले.
-----------------------------
मेगॅस्थेनिसच्या ग्रंथात
श्रीकृष्णाचा उल्लेख
ग्रीक इतिहासतज्ज्ञ मेगॅस्थेनिसच्या ‘इंडिका’ ग्रंथात वर्णन केलेल्या प्रदीर्घ वंशावळीत श्रीकृष्णाचा उल्लेख अन्य नावाने येतो. तसेच हेरोडॉटस या ग्रीक इतिहासतज्ज्ञाच्या पुस्तकात अशाच प्रकारचे वर्णन श्रीरामाबाबत येते. स्थानिक भाषेच्या प्रभावामुळे नावे वेगळी वापरली असली तरी त्यांच्या वर्तनातून हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकते.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.