हुशार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित! सर्वांसाठी खुल्या फेरीत अकरावी प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता
पुणे, ता. ३१ :
उदाहरण पहिले : दहावीच्या परीक्षेत श्वेता पाटील (नाव बदललेले आहे) हिला ९२ टक्के गुण मिळूनही अद्याप अकरावीच्या प्रवेशासाठी पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेले नाही.
उदाहरण दुसरे : श्वेताप्रमाणेच अथर्व देशमुख (नाव बदललेले आहे) याला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण असून, त्यालाही अद्याप पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेले नाही. अथर्वने तर पुण्यातील ‘सर्वोत्तम दहा’मध्ये नसलेल्या आणि गेल्या वर्षी विज्ञान शाखेचा कट-ऑफ ६९ टक्के असणाऱ्या महाविद्यालयाला प्राधान्य दिले आहे. मात्र, तरीही अथर्वला प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेले नाही.
श्वेता असो वा अथर्व यांच्याप्रमाणे हजारो विद्यार्थ्यांना दहावीमध्ये चांगले गुण मिळूनही अद्याप पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही. विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांसह अन्य मंडळांच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तुलनेने लवकर जाहीर झाला आहे. निकाल जाहीर होऊन अडीच महिने झाले तरीदेखील अद्याप ९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या, तसेच अन्य तुलनेने चांगले गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक हवालदिल झाले आहेत. चांगले गुण मिळूनही पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडत आहे.
शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला. यात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने या प्रवेशप्रक्रियेच्या तरतुदी निश्चित केल्या आणि त्यासंदर्भात ६ मे २०२५ रोजी अध्यादेश काढला. त्यानुसार अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत सर्वसाधारण चार फेऱ्यांचे गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात आले. यात सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू होते. त्यानंतर आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ‘सर्वांसाठी खुली’ या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील. उर्वरित रिक्त जागांकरिता दोन दिवसांचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना असणार आहे. उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ दहावीच्या प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. यासाठी संगणकीय प्रणालीचा व ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येणार आहेत.
‘‘अकरावीच्या प्रवेशात गेल्या वर्षीपर्यंत तिसऱ्या फेरीपर्यंत सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असायचे. परंतु, यंदा चौथ्या नियमित फेरीपर्यंत हे आरक्षण लागू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्यामुळे विशेषत: खुल्या गटासाठी यंदा मोठी स्पर्धा होती आणि या गटासाठी केवळ २८ टक्केच जागा उपलब्ध होत्या. परंतु, आता चौथ्या फेरीनंतर पुढील फेरीत अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे. कारण, आता अन्य सामाजिक आणि समांतर आरक्षणातील रिक्त जागा सर्वांना प्रवेशासाठी खुल्या होतील.’’
- सचिन हलदुले, सदस्य, अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती, पुणे विभाग
...................
‘‘राज्य सरकारच्या आदेशानुसार, अकरावीच्या प्रवेशात यंदा सर्वसाधारण चार फेऱ्या गुणवत्तेनुसार आयोजित करण्यात आल्या. यात सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू होते. परंतु, आता पुढील फेरी ‘सर्वांसाठी खुली’ अशी विशेष असेल. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेशाची संधी मिळेल.’’
- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.