सद्विचारी लोकांनी परिवर्तनासाठी एकत्र यावे दिलीप कुलकर्णी यांचे आवाहन ः श्री. ग. माजगावकर पुरस्काराचे वितरण
पुणे, ता. १ ः ‘‘सामाजिक परिवर्तन एकदम होत नाही; चांगले, सद्विचारी लोक हळूहळू एकत्र येत जातात, तेव्हा परिवर्तन घडते. मात्र, यासाठी सकारात्मक गोष्टींचा जाणीवपूर्वक प्रसार करायला हवा.’’ असे मत पर्यावरणतज्ज्ञ आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र यांच्या सहयोगाने दिला जाणारा यंदाचा ‘माणूसकार श्री. ग. माजगावकर पुरस्कार’ कुलकर्णी यांना एका अनौपचारिक कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ४० हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. याप्रसंगी राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर, संपादक डॉ. सदानंद बोरसे, ढेरे संस्कृति-संशोधन केंद्राच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे, केंद्राच्या सचिव वर्षा गजेंद्रगडकर उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘उपयोग, उपभोग आणि अर्थार्जन हे जगण्याचे आवश्यक घटक आहेत. मात्र, या तिन्ही घटकांना मर्यादा असली तरच निसर्ग अबाधित राहून माणूस समाधानी आयुष्य जगू शकतो. विनाश की विकास, यापैकी आपल्याला कोणती वाट निवडायची आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे. एकट्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी बदल घडणार नसला तरी निदान आपल्या अंतर्मनाने दाखविलेल्या वाटेवर चालण्याचे समाधान असते.’’
‘‘कुलकर्णी हे ‘श्रीगमां’ची विचारधारा आणि विधायकता पुढे नेणारे लेखक आहेत.’’ असे गौरवोद्गार माजगावकर यांनी काढले.
‘‘कुलकर्णी यांची जीवनदृष्टी ही सध्याच्या काळाची आत्यंतिक गरज आहे. आपल्या ठाम विचारसरणीतून आणि प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाच्या विवेकी संतुलनाचे धडे देणारे त्यांच्यासारखे लेखक दुर्मिळ आहेत.’’ असे डॉ. ढेरे म्हणाल्या.
‘‘मराठी वाचकांना आणि पर्यावरणाच्या अभ्यासकांना पर्यावरणाच्या प्रश्नांचा केवळ परीघ आणि व्याप्ती दाखवण्यापेक्षा या प्रश्नांच्या केंद्रबिंदूकडे घेऊन जाणारे दिलीप कुलकर्णी हे विचारशील आणि कृतिशील लेखक आहेत.’’ असे गजेंद्रगडकर यांनी अधोरेखित केले. डॉ. बोरसे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.
फोटो ः 36506
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.