अध्यात्माची जोड मिळाल्यास 
न्यायदान सोपे : जमादार

अध्यात्माची जोड मिळाल्यास न्यायदान सोपे : जमादार

Published on

पुणे, ता. १७ ः ‘‘न्यायदानाचे काम सोपे नसते. विविध रूढी, परंपरा, प्रथा यातून व्यक्तीची मानसिक धारणा तयार होते. परंतु न्यायासनावर बसल्यावर सर्व धारणा बाजूला ठेवून निष्पक्षपणे काम करावे लागते. अशा वेळी निर्णय घेताना अध्यात्माची जोड मिळाल्यास निर्णय घेणे सोपे जाते.’’ असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. के. जमादार यांनी व्यक्त केले.
न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी लिखित आणि अनुबंध प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मुक्तांची अभंग वाट’ आणि ‘ज्ञाना तू का जनी निळा, नामी गोरा?’ या पुस्तकांचे प्रकाशन जमादार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. के. महाजन, अनुबंध प्रकाशनाचे संचालक अनिल कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘संत साहित्याचा योग्य अर्थ समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने बंडोपंत कुलकर्णी अभ्यास, मनन, चिंतनातून लिहिते झाले आहेत. त्यांचे लिखाण स्वानुभूतीवर आधारित आहे. न्यायाधीशांना अध्यात्माची बैठक असणे आवश्यक आहे. अनेक न्यायमूर्ती व न्यायाधीशांनी उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संतसाहित्याचा अभ्यास केला आहे.’’
‘‘न्यायदानाच्या क्षेत्रात काम करत असताना गुरूंच्या आदेशाने मी अध्यात्माकडे वळलो. त्यातूनच लिहिता झालो. संत साहित्याच्या शोधातून वाचन, साधना आणि अभ्यास या मार्गातून जे उमगले ते कागदावर उतरवले.’’ असे बंडोपंत कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ. दीपक डोंगरे, ॲड. आशिष कंकाळ यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.

फोटो ः 40605

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com