घरातील सांडपाणी होऊ शकते शेतीयोग्य

घरातील सांडपाणी होऊ शकते शेतीयोग्य

Published on

नरेंद्र साठे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २ ः दिवसेंदिवस वाढणाऱ्या पाण्याच्या संकटाकडे लक्ष देत पुण्यात शिकणाऱ्या पाच मुलांनी नावीन्यपूर्ण उपाय शोधला आहे. घरगुती सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते शेतीसाठी पुन्हा वापरता येईल, अशी कल्पना त्यांनी कृतीत उतरवली आहे. ‘ग्रे वॉटर व्यवस्थापन प्रणाली’ या नावाने त्यांनी तयार केलेला हा प्रकल्प सध्या पुण्यात सुरू असलेल्या कृषी हॅकेथॉनमध्ये शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सांगली जिल्ह्यातील आष्टामधील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या शाखेतील पाच विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प एखाद्या घरासाठी, गृहनिर्माण संस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे रोहन वाघमारे म्हणाले, ‘‘सांडपाण्याचा पीएच ८.९ आणि टीडीएस चार हजार ५०० पर्यंत असतो. त्यामुळे ते पाणी कोणत्याही वापरासाठी थेट उपयुक्त ठरत नाही. मात्र, आमच्या प्रणालीच्या माध्यमातून तेच पाणी आम्ही पीएच सात आणि टीडीएस जवळपास २५० पर्यंत नियंत्रित करू शकतो, जे शेतीसाठी किंवा घरगुती पुनर्वापरासाठी योग्य ठरते. या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय थांबेल.’’

विद्यार्थी म्हणतात
- एका घरातून दररोज साधारण ४०० लिटर सांडपाणी तयार होते
- जर एका संपूर्ण गावाचा किंवा इमारतीचा विचार केला तर अधिक सांडपाणी तयार होऊ शकते
- त्यापैकी सुमारे ७० ते ८० टक्के पाणी पुन्हा वापरत येऊ शकते

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून एक विश्‍लेषणात्मक प्रणाली तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा प्रकार आणि शेताचे क्षेत्रफळ दिल्यास त्या पिकाला आवश्यक असणारे पाण्याचे प्रमाण एआय प्रणालीद्वारे सुचवले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न होता नियोजनाद्वारे पाण्याचा वापर करता येतो.

ग्रे वॉटर म्हणजे काय?
ग्रे वॉटर म्हणजे स्वयंपाकघर, स्नानगृह, हात धुणे अशा घरातील कामांमधून निर्माण होणारे सांडपाणी. हे पाणी थेट वापरण्यास योग्य नसले तरी त्याचे योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्वापर करणे शक्य आहे. याच संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी सात स्तरांची शुद्धीकरण प्रक्रिया विकसित केली आहे.

प्रकल्प बनविलेले विद्यार्थी...
सज्जाद बिडीवाला, सारांश जाजू, शिवम वाघमोडे, मोहम्मद सय्यद, अक्षिता झा.

सात स्तरांद्वारे पाण्याचा दर्जा सुधारणा
१) चाळणी कक्ष - सांडपाण्यातील पदार्थांचे कण वेगळे केले जातात
२) रासायनिक मिश्रण - शासनाकडून वापरण्यात येणाऱ्या रसायनांच्या साहाय्याने द्रवात मिसळलेले घटक गाळ स्वरूपात पंपाद्वारे बाहेर काढले जाते
३) तेल वेगळे करणे - पाण्यातील तेल वेगळे केले जाते
४) कठीण धातू विलगीकरण - झिंक, सल्फेट यांसारखे धातू दूर केले जातात
५) कार्बन गाळणी - दुर्गंधी व सूक्ष्म अशुद्धपणा दूर केला जातो
६) अंतिम शुद्धीकरण - आरओ तंत्रज्ञानाद्वारे पाणी वापरण्यायोग्य बनविले जाते
७) पुनर्वापर नियोजन - शेती, फ्लशिंग, बागकाम, गाड्या धुणे अशा विविध वापरासाठी पाणी उपलब्ध होते

आज शेतीसाठी जमीन आणि खत यावर भर दिला जातो, पण पाण्याचे व्यवस्थापन दुर्लक्षित राहते. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवरचा ताण कमी करून आपण वापरलेले पाणी शुद्ध करून शेतीसाठी
वापरल्यास शाश्वत शेती शक्य होईल. आम्हाला शेतीसाठी अधिक चांगल्या दर्जाचे पाणी उपलब्ध होण्यासाठी काम करायचे आहे.
- सज्जाद बिडीवाला, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com