सुधारणा स्वागतार्ह; काही तरतुदींबाबत साशंकता

सुधारणा स्वागतार्ह; काही तरतुदींबाबत साशंकता

Published on

मार्केट यार्ड, ता. २३ : कृषी उत्पन्न व्यापारातील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव मिळावा, बाजार समित्यांचे कामकाज गतिमान व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात सुधारित अध्यादेश काढला आहे. या निर्णयाचे व्यापारी कृती समितीने स्वागत केले असले तरी, काही महत्त्वाच्या कलमांमुळे भविष्यात प्रशासकीय अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असल्याची भूमिकाही समितीने व्यक्त केली आहे.
या संदर्भात समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. अध्यादेशाची अंमलबजावणी शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती या तिन्ही घटकांच्या हिताचा विचार करून व्हावी. काही तरतुदींमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. कलम ५-१(ब) नुसार संचालक मंडळात पणन मंत्री, राज्यमंत्री व संचालकांचा समावेश केल्यास अपील प्रक्रियेत हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. ज्यांनी आदेश दिला, त्यांच्याकडेच दाद मागण्याची वेळ येऊ नये. स्वतंत्र आणि निष्पक्ष अपील यंत्रणा उभारणे गरजेचे आहे, अशी मागणी व्यापारी समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
कलम ५-१(६) नुसार शेतकरी प्रतिनिधींच्या निवडीसाठी स्पष्ट निकष ठरवावेत. प्रत्यक्ष शेती करणारे, बाजारभाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेले शेतकरीच प्रतिनिधी म्हणून असावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनुभव, आयात-निर्यातीतील योगदान यांसह अन्य बाबींना संतुलित प्रतिनिधित्व देण्याची आवश्यकता आहे. या सर्व तरतुदींवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्यापारी कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा व्हावी, अशी मागणी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी केली आहे.

परवाना आणि बाजार शुल्कासंबंधी नव्या तरतुदींमुळे प्रत्यक्ष व्यापार न करणाऱ्या व्यक्तींना संचालकपद मिळण्याची शक्यता असल्याने प्रामाणिक व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ शकतो. मोठ्या बाजार समित्यांसाठी पूर्वीप्रमाणे विशेष तरतूद कायम ठेवावी.
- राजेंद्र बाठिया, समन्वयक, महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती

अध्यादेशातील अनेक बाबींवर सखोल चर्चा होणे अत्यावश्यक आहे. बाजार समित्यांचा कारभार पारदर्शक राहण्यासाठी सर्व घटकांचा विचार केला पाहिजे. सुधारित अधिनियमाची प्रत तातडीने उपलब्ध करून दिल्यास शंका निरसनाला मदत होईल. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आमच्या प्रतिनिधींशी बैठक घ्यावी.
- रायकुमार नहार- माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com