
उरुळी कांचन : भरधाव टेम्पोने सेवा रस्त्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना जोरात धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे- सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौक बस थांब्यावर बुधवारी (ता. २) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) व अशोक भीमराव (वय २५, रा. बसनाळ सावली, बिदर, कर्नाटक), अशी या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर, लक्ष्मण बापूराव भारती (वय ६१, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०), भागवत पेरू बनसोडे (वय ४०, दोन्ही रा. सोरतापवाडी), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय ६७, रा. आंबा पिंपळगाव, लातूर) अशी जखमींची नावे आहेत.