Ujani Dam Water : उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात घट; तीन महिन्यांत ३२ टीएमसीचा वापर

पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.
ujani dam
ujani damsakal

पळसदेव - पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. दरवर्षी जानेवारीतही शंभर टक्के पाणीसाठा असण्याच्या श्रृंखलेस यंदा मात्र खंड पडला आहे.

गतवर्षी जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असलेल्या धरणातील पाणी पातळीने यंदा मात्र तळ गाठल्याचे दिसते. गेल्या तीन महिन्यांत उजनीतील सुमारे ३२ टीएमसी पाण्याचा वापर झाल्याने पाणी पातळीने मृतसाठ्यात प्रवेश केला आहे. धरणातील पाण्याचा सुरु असलेला अपव्यय यंदा दुष्काळाचे तीव्र चटके दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया बॅकवॉटरलगतच्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

सन २०२० पासून दरवर्षी धरणात जानेवारीत शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध असे. गतवर्षी २० जानेवारीपर्यंत धरण शंभर टक्के भरलेले होते. यंदा मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जानेवारीत धरणातील उपयुक्त पाणी साठा संपुष्टात आला असून, धरणातील पाणी पातळीने मृतसाठ्यात प्रवेश केला आहे. यंदा धरण ६० टक्के (९५ टीएमसी) भरले होते. यामध्ये ६३ टीएमसी मृत पाणीसाठा आहे. तर ३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता.

१६ आक्टोबर २०२३ पर्यंत धरणातील उपयुक्त ३२ टीएमसी पाणीसाठा शाबूत होता. मात्र यानंतर कालवा, नदी, बोगदा, पाणी योजनांव्दारे सोलापूर जिल्ह्याला दिलेल्या पाण्यामुळे उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला होता. परिणामी धरणात जानेवारीतही शंभर टक्के पाणी साठा होता.

यंदा अपुऱ्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी ऐन पावसाळ्यात शंभरीपर्यंत पोचली नव्हती. यामुळे यंदा टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंधरा दिवसांत ८ टीएमसी पाण्याचा वापर

नदीद्वारे सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या पाणी योजनांसाठी सोडण्यात आलेले पाणी, रब्बीतील आवर्तनासाठी सुरू असलेला कालवा, बोगदा, सीना-माढा योजनेचे आवर्तनातून पंधरा दिवसांत सुमारे ८ टीएमसी पाणी वापर झाल्याचे दिसून येत आहे. नदीतून पाणी सोडणे सध्या बंद केले आहे, परंतु ४ टीएमसीहून अधिक पाणी नदीतून सोडले आहे.

सध्या सीना-माढा योजनेसाठी २९७ क्युसेक्स, दहिगाव योजना ८० क्युसेक्स, बोगद्यातून २९० क्युसेक्स व मुख्य कालव्याद्वारे २४०० क्युसेक्सने पाणी देणे सुरू आहे. कालव्याचे आवर्तन १० फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे मृत साठ्यातील पाण्याचाही वापर होणार असल्याचे निश्चित आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार धरणातील पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे. सध्या कालव्यातून सुरू असलेले शेती सिंचनासाठीचे रब्बीतील आवर्तन या वर्षातील अखेरचे आवर्तन असेल. यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून मार्च व मे महिन्यांमध्ये पाणी सोडले जाईल. शेती सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन नाही.

- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com