बाई ः बारीकशी ईच्छा

बाई ः बारीकशी ईच्छा
Published on

बाई ः बारीकशी इच्छा

स्त्री काय किंवा बाई काय प्रत्येकीची कहाणी जेमतेम सारखीच. भारत असो किंवा भारताबाहेर स्त्री ही कोणत्या ना कोणत्या रूपात आपली नात्याची, संसाराची जबाबदारी पेलून नेताना दिसतेच. त्या स्त्रीची कहाणी आपण कितपत जाणून घेतो? पुरुष म्हणून तटस्थपणे आपण सहज बोलून जातो तिला काय जाणायचं? माहितीय तिला काय वाटतं वगैरे; पण खरंच का आपण स्त्रीला जाणतो? की म्हणायचं म्हणून किंवा तिचा विषय टाळायचा म्हणून हा विषय आपण नजरेआड करतो? आपल्या आयुष्यात असलेली ती प्रत्येक स्त्री मग ती आई, बहीण, बायको, प्रेयसी, मैत्रीण, आजी कोणी ना कोणी असो, आपण खरंच का तिला पूर्णपणे जाणतो? पुरुष म्हणून ती आपल्या सोबत असते (राहते), आपल्याला समजून घेते, आपली काळजी करते. बदल्यात प्रेम देखील देते; पण तिला गरज असते तेव्हा आपली बुद्धी, आपली समज कुठे जात असेल बरं?
जग इतकं पुढं आलेलं आहे, की त्या परमेश्वरालाही त्याच्या निर्मितीवर विचार करावासा वाटत असेल. काय बदललं नाही या जगात? सगळ बदललं, माणूस- जात, त्याचे राहणीमान, त्याच्या इच्छा, भौतिक सृष्टी, विज्ञान आणि तंत्रज्ञानसुद्धा. दैवी शक्तीला आव्हान देणारे शोध माणूस लावत असेल, तर देवाला विचारणारे पुढे किती उरतील? पण तरी ही अशा या जगात बाई म्हणायला पुरुषाला खांद्याला खांदा लावून चालणारी बाई तिची सावली तू बघितलीस का कधी?
तिची सावली तिच्या पायासोबत चालत असते; पण मागे पूर्ण मोकळ्या रस्त्यावरून तिच्या सावलीचे दुसरे टोक घर, मूल, संसार या गोष्टींत अडकून राहिलेली असते. ही बात दिवसाच्या उन्हाची झाली. रात्री तीच सावली गुडूप होते तिच्याच घरात. लख्ख दिवाबत्ती करून देखील घरात पुरा प्रकाश पडलेला असतानाही तिची सावली दिसेनाशी होते त्या घरात. अशा वेळी ती तिच्या त्या दिवसासाठी जागून रात्रीला स्वतः विझवत चाललेली असते.
या दिवसभराच्या वेळात पुरुष देखील आपले बलदंड खांदे गाळून बसतो; पण ती बाई तिच्या नाजूक खांद्यांना इतकं झिजवते की एक सवय बनून जाते. मग ना तिला स्वतःची कीव येते ना तिला तो कधी समजून घेऊ शकतो किंवा जाणून घेतो. आजूबाजूचे, त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार? आणि दुसरी बाई छे..! अशक्य.. अशक्यच.. कारण जग इतकं पुढं आलं आहे; पण एक बाई दुसऱ्या बाईला जराही जाणून घेऊ शकत नाही.
कोणतीही जबाबदारी स्त्रीला अशी अचानक मिळालेली नाही. मुळात जबाबदारी हा किस्साच मुळी तिच्या नशिबात नव्हता; पण लाखो वर्षांपूर्वी पुरुष आणि स्त्री दोघे जेव्हा शिकार करून निवारा जपत अपत्य पोसायचे, तेच युग पुढे बदलत गेले तसे सगळे पुरुष पुढे होऊन सगळं करू लागले. काही जबाबदाऱ्या तात्पुरत्या स्त्रीला देऊ लागले आणि त्या जबाबदाऱ्या परत करून टाकणं तिला जमलंच नाही.
तो मागायचा विसरला, नंतर आठवण झाल्यावर टाळायला लागला. त्याची जबाबदारी आता स्त्रीकडे होती आणि ती योग्य रीतीने त्याची जबाबदारी आणि पोरं दोन्ही ती पोसत होती. त्यामुळे तो निर्धास्त झाला. मग पुढे त्यात फक्त भरती होत गेली जबाबदारी नावाच्या त्वचेची. ही त्वचा प्रत्येक बाईला आवडते. तिला सजवायला आवडते. मिरवायला आवडते. चार बायकांत दाखवायला आवडते.
बाईचं आयुष्यच खूप अवघड आहे आणि मग मूल जन्माला येताना पहिला मुलगाच जन्मावा अशी अट एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीला घातली जाते. पुरुषाला कोणीही चालतं. असं का? याचा विचार ना पुरुष स्वतःला विचारतो ना बाई याचा विचार करून स्वतःत बदल करते. जन्मणे, जगणे, मरणे अशी त्रीसूत्री असलेली पुरुषाची लाइफ मला एक बाई आणि आई म्हणून सुरक्षित वाटते.

तसंही आज पुरुष शस्त्रक्रिया करून बाई बनत आहेत. बायकांचे पण तेच हाल. पुरुष म्हणे आता मुलांना जन्म देखील देतायत; पण मला सांग बाईचं सगळं सोंग पांघरता येईल; पण तिचं मन? ते कसं तयार करणार? मन म्हणजे आत्मा. तो फक्त आहे. आज विज्ञान इतकं प्रगत झालं आहे, की काय कशावर उपाय नाही इथे? पण माणूस मेला की मेला. त्या आत्म्याला दुसरा पर्याय आहे?
कृत्रिम मेंदू, कृत्रिम डोळे, कृत्रिम हृदय, तसंच फुफ्फुस, यकृत, हात, पाय, केस सगळं-सगळं कृत्रिम बाजारात लाखांच्या भावाने मिळत आहे; पण कृत्रिम मनाची बाजारपेठ अजून आलेली नाही. वाघ, सरडा, सिंह, एकशिंगी गेंडा, हत्ती आणि प्यायचं पाणी भविष्यात अशा एक ना अनेक गोष्टी दुर्मीळ होत जातील किंवा मग संपुष्टात येतील, तेव्हा त्या गोष्टी फक्त पुस्तकांत आणि दंतकथेत उरतील, तेव्हा त्यात बाई नावाची गोष्टपण त्यात असेल. आज पुरुष हवा म्हणून हट्ट धरला जातोय; पण भविष्यात त्याची किंमत मोजावी लागणार आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रा. बाईशिवाय पुरुषाचं आयुष्य अपूर्णच! ज्याच्या आयुष्यात बाई नावाचं पात्र नाहीच, त्याने तिची वाट बघावी किंवा तिचा शोध घ्यावा आणि असेच कोणी कमनशिबी तर त्याने एक लक्षात ठेवावं जे घडत नाही जगात तेच त्याच्यासोबत झालं आंहे. त्याच्या आयुष्यात बाई नसली तरी त्याचा जन्म हा एका बाईपासूनच झालेला आहे. त्यामुळे काळजी करायची काही गोष्ट नाही. एक मात्र नक्की बाई ना कधी कोणाला समजली ना कधी समजेल.


-अजिंक्य भोसले
9923690609

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com