

MGV26B16594
मंगळवेढा : पात्रापासून काही अंतरावर असलेली नदीपात्रातील बंधाऱ्याची दारे.
---
दुष्काळात नियम नको, पाणी अडवा!
१५ ऑक्टोबरची वाट न पाहता बंधाऱ्यांची दारे आता बसविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २० : भीमा नदीवरील तालुक्यातील बंधाऱ्यांची दारे दरवर्षी १५ ऑक्टोबरनंतर बसविली जातात. मात्र, यंदाची तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता १५ ऑक्टोबरची वाट न पाहता बंधाऱ्यांची दारे तातडीने बसवावीत, अशी आग्रही मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीपात्रातील पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. दुसरीकडे, उजनी व वीर लाभक्षेत्रात अतिरिक्त झालेले पाणी नदीपात्रातून सोडण्यात आल्याने जवळपास ५९ टीएमसी पाणी वाहून गेले. तालुक्यातील उचेठाण, बठाण, माचणूर, सिद्धापूर व अरळी या बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेती आहे. तसेच पंढरपूर व मोहोळ तालुक्यांतील अनेक गावांची शेती आणि पाणीपुरवठा योजनाही या बंधाऱ्यांवर अवलंबून आहेत.
सध्या शेतांमध्ये ऊस आणि अन्य पिके उभी असून, ती अंतिम टप्प्यात आहेत. या पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी आताच अडविले नाही, तर हाता-तोंडाशी आलेला ऊस आणि अन्य पिके डोळ्यांदेखत जळून खाक होतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
---
अपवादात्मक परिस्थितीचा विचार गरजेचा
नियमनानुसार १५ ऑक्टोबरला बंधाऱ्यांची दारे बसविली जातात, हे खरे असले तरी सध्याची परिस्थिती सामान्य नाही. पुढील काही दिवसांत पाणी अडविले गेले नाही, तर या भागातील शेती मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने केवळ नियमनाचा विचार न करता यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. विशेष बाब म्हणून नदीवरील बंधाऱ्यांची दारे युद्धपातळीवर तातडीने बसवावीत, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
---
कोट
सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा विचार करून साडेचार मीटर उंचीच्या बंधाऱ्याची दारे सध्या अडीच मीटरपर्यंत बसविण्यात आली आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यात आणखी वाढ करण्यात येईल.
- नागेश जडे, शाखा अभियंता, उजनी पाटबंधारे विभाग
---
कोट
यंदा उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरूनही पाणी आणि विजेच्या बाबतीत जलसंपदा विभागाचे नियोजन कोलमडले. दुष्काळी परिस्थितीत नदीपात्रात पाणी उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने दूरदृष्टी दाखवून १५ ऑक्टोबरपूर्वीच बंधाऱ्यांची दारे बसविणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही संधी हातातून गेली. आता नदीपात्रातील पाणी संपले असून बंधाऱ्यातही पाणी शिल्लक राहिलेले नाही. वेळेत नियोजन करून बंधाऱ्यांची दारे बसविली असती, तर शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा फायदा झाला असता.”
- अनिल बिराजदार, संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.