Ajit Pawar : गुंड प्रवृत्तीच्या 'पुष्पराजां'ना वेळीच आवरा

उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

उरुळी कांचन - जनतेचे मित्र बनून राहणे ही पोलिसांची भूमिका असते. समाजात शांतता निर्माण होईल असे विश्वासाचे नाते पोलिसांनी निर्माण केले पाहिजे. पोलीस प्रशासन सकारात्मक बदल घडून आणू शकतात. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस खात्याला वीस कोटींचा निधी दिला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करतो. तसं पोलीस प्रशासनाने आदरयुक्त दबदबा समाजामध्ये निर्माण करावा.

सायबर गुन्ह्यांना आळा घालणे गरजेचे आहे. गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे. हल्ली जेल मधून बाहेर आल्याचे देखील बॅनर झळकतात. दाढी वाढवलेल्या गुन्हे करणाऱ्या अशा 'पुष्पराजा'ना वेळीच आवर घाला. त्यांची बॅनरबाजी थांबवावा. गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण होता कामा नये असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीस दल अंतर्गत उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे शनिवारी (ता. २०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त आर.राजा, शिरूर-हवेली आमदार अशोक पवार, दौंड आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक प्रदीप कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की उरुळी कांचन हे गाव पूर्व हवेलीतील प्रवेशद्वार म्हणून ओळख आहे. पूर्व हवेलीत दुग्धव्यवसाय, द्राक्षबाग, ऊसशेती, नर्सरी आदी व्यवसाय वाढले आहेत. काळ बदलतो आहे, रहदारी वाढती आहे. वेगवेगळे प्रश्न असतात. उलाढाल होणारे हे मोठे गाव आहे. मुख्य बाजार पेठ आहे. बेशिस्त वाहन पार्किंगमुळे उरुळी कांचन येथील तळवाडी चौक आणि एलाइट चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी सातत्याने होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक तर रिंग रोड किंवा उड्डाणपूल. उड्डाणपुलासाठी जागा पाहाव्या लागतील त्या ताब्यात घ्याव्या लागतील. तर रिंग रोड हा बाहेरून करावा लागेल, यासाठी गडकरी साहेबांची मदत घेऊन प्रयत्न करणार आहे.

शिरूर-हवेली आमदार अशोक पवार म्हणाले, की पुणे ग्रामीण पोलीस दल अंतर्गत स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस स्टेशन व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या पाठपुराव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली. आमच्या तीन मागण्या आहेत. तळवाडी चौकातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी उड्डाणपूल, उरुळी कांचनची नगरपरिषदेसाठी मागणी, ग्रामीण रुग्णालयासाठी जागा. या कामाच्या फाईल जिल्हा परिषदेकडून राज्याकडे गेली तर काम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com