पुणे - क्रूड ऑईलचे वाढत्या दराच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल, तर इलेक्ट्रिक बसशिवाय पर्याय नाही, म्हणूनच देशात सर्वाधिक ५ हजार ई-बस महाराष्ट्रात आणण्यात येणार असून, त्यातील दोन हजार पुण्यात असतील, असे पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी सिंगापूरमधील ग्लोबल मास ट्रान्झिटमध्ये ‘क्लीन बसेस इन सिटी इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर सादरीकरण करताना सांगितले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आयोजित या दोन दिवसांच्या परिषदेत पीएमपीचे संचालक म्हणून शिरोळे यांना आमंत्रित केले होते. ते म्हणाले, ‘‘इंधनाच्या किमती आणि पर्यायाने प्रदूषण वाढत असल्यामुळे ई-बसचा वापर वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठीच ई - बसची देशातील मोठी निविदा पुण्यात काढण्यात आली आहे. प्रवाशांना एसी ई-बस नॉन एसी बसच्याच दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.’’ ई-बस पर्यावरणपूरक असून, त्यामुळे प्रदूषणही कमी होणार आहे. नजीकच्या काळात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात सर्वत्र ई-बस दिसू लागतील. आशिया खंडामध्ये सार्वजनिक वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषण यांचा खूप प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्यासाठी सीएनजी, इलेक्ट्रिक, हायड्रोजन व हायब्रीड बसेसची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.