वेल्हे, (पुणे) - 'आझादी का अमृत महोत्सव'च्या अंतर्गत, केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याही वर्षी केंद्र सरकारकडून सर्व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वज विक्रीस सुरुवात झाली असून. २५ रुपयात राष्ट्रीय ध्वज मिळणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवावा असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी केले आहे.
'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, त्यांच्या योगदानाचे स्मरण करून प्रत्येक भारतीयांनी घरांवर भारताचा राष्ट्रध्वज १३ ते १५ ऑगस्ट, या कालावधीत फडकवावा तसेच भारताचा 'स्वातंत्र्य दिन' त्याच उत्साहाने आणि देशभक्तीने साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम आयोजित केली आहे.
या मोहिमेच्या महत्त्वाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी, भारत सरकारने टपाल विभागावर सोपविली आहे. त्या अनुषंगाने सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून, २५ रुपयांमध्ये राष्ट्रीय ध्वज प्रत्येक टपाल कार्यालयामध्ये मिळणार आहे.
टपाल खात्याच्या माध्यमातून यांची जागरूकता करण्यासाठी पुणे ग्रामीण डाक विभागातील सर्व उप डाकघर व शाखा डाकघरामध्ये 'हर घर तिरंगा २०२३ अंतर्गत राष्ट्रीय ध्वजांची विक्री सुरू करण्यात आली आहे.
तरी सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील डाकघरामधून राष्ट्रीय ध्वज विकत घेवून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहन श्री. बी. पी. एरंडे, अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी केले आहे.