Vidhan Sabha 2019 : बंडखोरांची मनधरणी सुरूच 

Vidhan Sabha 2019 : बंडखोरांची मनधरणी सुरूच 

विधानसभा 2019  
पुणे - शहरातील पाच मतदारसंघांत बंडखोरांनी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षाकडून तसेच उमेदवारांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बंडखोरांनी अद्याप त्यांना भाव दिलेला नाही. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तोपर्यंत बंड थंड करण्यासाठी खटाटोप करावा लागणार आहे.

युतीत शिवसेनेला पुण्यातून एकही मतदारसंघ सुटलेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत बंडखोरी केली. यात खडकवासल्यातून जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, वडगाव शेरीतून नगरसेवक संजय भोसले, कसब्यातून विशाल धनवडे तर कॅंटोन्मेंटमधून नगरसेविका पल्लवी जावळे यांनी अर्ज भरला आहे. काँग्रेसकडून कसब्यातून तीव्र इच्छुक असलेल्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली. पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल, कॅंटोन्मेंटमधून सदानंद शेट्टी यांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे. भाजपच्या नगरसेविका कविता वैरागे यांचे पती डॉ. भरत वैरागे यांनी कॅंटोन्मेंटमधून बंडखोरी केली. शनिवारी झालेल्या अर्ज छाननीत या सर्व बंडखोर उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी बंडखोरांवर कारवाईचा इशारा दिला. पण, त्याचा फरक पुण्यातील शिवसेना बंडखोरांवर पडलेला नाही. जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले, ‘‘मला दुसऱ्या पक्षातून उमेदवारीसाठी विचारणा होत होती. पण, शिवसेनेवर निष्ठा असल्याने मी तिकडे गेलो नाही. पक्षाचा एबी फॉर्म मिळेल, अशी मला अपेक्षा होती. आता अर्ज भरल्याने खेड्यापाड्यात जाऊन कार्यकर्त्यांना भेटत असून, माघार न घेण्यासाठी शिवसैनिकांचा दबाव आहे. याचप्रमाणे नगरसेवक धनवडे यांनी माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तर, संजय भोसले यांनी भूमिका निश्‍चित करण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत.’’

पर्वतीतून आबा बागूल यांनी माघार घ्यावी, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्‍विनी कदम व त्यांचे पती नितीन कदम यांनी रविवारी सकाळी त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची भेट झाली नाही. काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कमल व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला. त्या माघार घेतील, असे सांगण्यात आले.

पक्‍क्‍या आश्‍वासनाची अपेक्षा
बंडखोरी करणारे पदाधिकारी व नगरसेवक उमेदवारी अर्ज मागे घेतील. पण, पक्षाकडून काही ना काही पदरात आश्‍वासन पाडून घेण्यासाठी ते अडून बसले आहेत. अजून दोन दिवस आहेत. त्यापैकी बरेच जण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तयार होतील, अशीही चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com