
पुणे : धायरी भागात पाणी टंचाई
पुणे : खडकवासला धरणाच्या दाराची देखभाल दुरुस्ती सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्याचा फटका धायरी, नऱ्हे यासह परिसरातील नागरिकांना बसला असून, गेल्या दोन तीन दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, नांदेड यासह इतर गावांना या भागातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. धायरीला बारांगनी मळ्यातील विहिरीतून पाणी दिले जाते. खडकवासला धरणातून पर्वती येथे येणाऱ्या ३००० मीमी व्यासाच्या जलवाहिनीतून १६ इंचाचे दोन जोड देण्यात आला असून, त्यातून हे पाणी या विहिरीत टाकले जाते. तेथून पंपिंग करून या गावांमध्ये पाणी पोचविले जाते.
पावसाळ्याच्या पूर्वी पाटबंधारे विभागाकडून धरणाचे दार व्यवस्थित उघडतात की नाही याची तपासणी केली जाते. यावेळी धरणाचे दार पूर्णपणे उघडले जातात. त्यासाठी धरणाची पाणी पातळी खाली न्यावी लागते. सध्या हे काम सुरू असल्याने पाणी पातळी कमी झाल्याने जलवाहिनीतून पाणी कमी येत असल्याने विहिरीत पाणी कमी पडत आहे. पुढील तीन चार दिवस अशीच स्थिती राहील असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
दुसऱ्या जलवाहिनीला जोड देण्याचा प्रयत्न
खडकवासला धरणातून दोन जलवाहिन्या पर्वतीपर्यंत जातात. सध्या ३००० मीमी व्यासाच्या जलवाहिनीतून विहिरीत पाणी दिले जाते. पण पाणी कमी पडत असल्याने दुसऱ्या २५०० मीमी व्यासाच्या जलवाहिनीतून १६ इंची नळजोड द्यावी अशी मागणी माजी नगरसेविका अश्विनी पोकळे यांनी केली आहे. त्यावर पावसकर यांनीही या पद्धतीने पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले.
Web Title: Water Scarcity In Dhayri Narhe Kirkatwadi Nandedcity Water Supply From Khadakwasla Dam Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..