
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्याने पुणेकरांना रोज एकवेळ पुरेसे पाणी देण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वी केला. प्रत्यक्षात मात्र उपनगरांसह डेक्कन, आपटे रस्ता, शिवाजीनगर परिसर आणि मध्यवर्ती भागांत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत.
पुरेसे पाणी असूनही नियोजनाअभावीच लोकांना पाणी मिळत नसल्याचे दिसत आहे. पावसामुळे धरण साखळीत शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे ज्या भागांत पाणीकपात सुरू आहे, ती मागे घेऊन शहराच्या सर्व भागांत रोज एकवेळ पाणी पुरविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले. त्यानुसार वडगाव जलकेंद्रातून होणारी कपात थांबविण्यात आली. त्यामुळे सिंहगड रस्त्यासह कात्रज, कोंढवा आणि धनकवडीतील पाणीपुरवठा नियमित झाला. मात्र, मध्यवस्तीतील पेठांसह शिराळे रस्ता, डेक्कन भागांत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही, अशी तक्रार महिलांनी केली. तसेच, कोथरूडच्या काही भागांसह कर्वेनगर, वारजे, धायरी परिसरात वेळापत्रकानुसार पाणी येत नसल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने सर्वत्र पाणी सोडण्यात येत आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ते सोडले जात आहे. सध्या ज्या भागांत पाणीपुरवठा सुरळीत नाही, त्या भागात तो सुरळीत केला जाईल. त्रुटी दूर केल्या जातील.’
हडपसर, मुंढव्यात पाणीकपात
पुणे : हडपसर व मुंढवा-मगरपट्टासिटी (क्र.२२) या प्रभागांसह परिसरातील लोकांना अपुरे पाणी मिळत असल्याचा आरोप नगरसेवक चेतन तुपे यांनी सोमवारी केला. आमदार योगेश टिळेकर यांच्यामुळेच पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. या भागांत ‘राष्ट्रवादी’ला मानणारा मतदार असल्याने लोकांना वेठीस धरले जात असल्याचेही तुपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगरसेवक बंडू गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर, पूजा कोद्रे उपस्थित होत्या. तुपे म्हणाले, ‘‘येथील रहिवाशांना दोन दिवसांपासून पुरेसे पाणी मिळत नाही. तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.’’ राष्ट्रवादीच्या आरोपांबाबत टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
लष्कर जलकेंद्राची मुख्य वाहिनी फुटली
विश्रांतवाडी : लष्कर पाणीपुरवठा केंद्राची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे ठाकरसी हिलवरून होणारा पाणीपुरवठा सोमवारी दुपारपासून विस्कळित झाला आहे. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले असून, रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता बुद्धप्रकाश वाघमारे यांनी दिली.
लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडून ठाकरसी हिल केंद्राला या मुख्य जलवाहिनीने पाणीपुरवठा होतो. सोमवारी दुपारी अचानक मोठी गळती सुरू झाली. त्यामुळे या परिसराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला.
यामुळे येरवडा, नागपूर चाळ, फुलेनगर, शांतीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, टिंगरेनगर, गांधीनगर, वडगाव शेरी या परिसरातील नियमितपणे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले असून, रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.