मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नोकरी

मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नोकरी
Published on

मृत्युमुखी पडलेल्यांच्या
नातेवाइकांना नोकरी

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा ः पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई ः राज्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत मंगळवारी (ता. २३) केली. शिवाय शिकारी वन्य प्राण्यांना खाद्य मिळावे यासाठी पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म तयार करण्यात येतील, अशीही घोषणा त्यांनी केली.
अतुल भातकळकर, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना वनमंत्री नाईक यांनी विविध घोषणा केल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील ४ महिला वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे भातकळकर यांनी मांडला. ते म्हणाले, ‘‘वन्यजीव आणि मानव संघर्ष आता दुर्दैवाने नवा राहिलेला नाही, तो जवळपास रोज घडतोय अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात २०२३ मध्ये ५५ लोक यात मृत्यू पडले आहेत. राज्यातील संवेदनशील दहा जिल्ह्यांत उपाययोजना केल्याचे सांगितले आहे. २६० कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरीही दिली आहे. यातील किती कोटी रुपये आपल्या खात्याकडे वर्ग झाले आहेत,’’ असा प्रश्न उपस्थित केला.
तेंदूपत्ता जमा करण्यासाठी गेलेल्या सात महिलांवर वाघाने हल्ला केला. त्यातील चार महिलांचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करत आहोत, अशी माहिती वनमंत्री नाईक यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘अशा घटना घडू नये यासाठी नाशिक येथे साडेपाच हजार हेक्टर जागेवर ताडोबा सारखे वनक्षेत्र करायचे ठरवले आहे. वन्य प्राण्यांना अटकाव करण्यासाठी बाबूंची रोपे लावून कुंपण घातले जाईल. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यात अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही अशी तयारी केलेली आहे.’’

४५० वाघांचे वितरण होणार
काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी सुखवस्तू घरातील लोक वाघ बघायला येतात त्या हजारो रुपयांसाठी गरीब लोकांना जीव गमवावा लागतो. जंगलाच्या क्षमतेत वाघ ठेवणे गरजेचे आहे. जंगलापेक्षा चारपट वाघ असले तर जंगलातील वाघ बाहेर येऊन लोकांवर हल्ले करतात. त्यामुळे अतिरिक्त वाघ दुसरीकडे हलवा. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील एकाला नोकरी द्या, अशी मागणी केली. यावर बोलताना वनमंत्री नाईक यांनी पुढील साडेतीन वर्षांत ताडोबाच्या धर्तीवर अभयारण्य केली जातील. त्यात ४५० वाघ वितरित केले जातील. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी प्रस्ताव तयार आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून मंजुरी घेऊ, असेही नाईक यांनी सांगितले.

भरपाईसाठी उणे प्राधिकर
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना भरपाई देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी असतो. मात्र ती मिळत नाही. वित्त विभाग वेळेत निधी देत नाही. त्यामुळे उणे प्राधिकार सुरू करा, जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर मदत मिळेल, अशी मागणी केली. यावर नाईक यांनी यापुढे मदतीसाठी उणे प्राधिकारातून मदत मिळेल, असे जाहीर केले.

पोल्ट्रीच्या धर्तीवर रॅबिट फार्म
या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले, ‘‘जंगलात खाद्य कमी व्हायला लागल्याने खाद्य निर्माण करण्यासाठी इतर प्राणी संख्या वाढवण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे.’’ यावर वनमंत्री नाईक म्हणाले, की पोल्ट्री फॉर्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म तयार करू, हरणांची प्रजाती वेगाने वाढविण्यासाठी प्रयत्न करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com