पुणे - येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती केली नाही, तरीही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, असे "एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट'ने केलेल्या सर्व्हेतून समोर आले आहे. राज्यातील 30 तालुक्यांतील पाच हजार नागरिकांच्या मतांच्या आधारे हा सर्व्हे करण्यात आला. यात भाजपला स्वबळावर 176, तर शिवसेनेला 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुक्रमे 33 आणि 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एमआयटीच्या स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटच्या प्रमुख परिमल माया सुधाकर, सहयोगी संचालक एस. एस. हारिदास, सहायक प्राध्यापक महेश साने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघांत 25 ते 29 ऑगस्ट या कालावधीत हा सर्व्हे केला आहे. यात वंचित बहुजन आघाडीला 2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खातेही उघडू शकणार नसल्याचे सर्व्हेत नमूद केले आहे. "ईव्हीएम'मध्ये गडबड होऊ शकत नसल्याचे सर्वाधिक नागरिकांचे म्हणणे आहे.
भाजप-शिवसेना युतीला 228 जागा
भाजपला 45 टक्के, शिवसेनेला 15 टक्के, कॉंग्रेस 14 टक्के आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला 7.85 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करून लढले, तर युतीला 228 जागा मिळतील आणि आघाडीला 51 जागा मिळतील, असे या सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.
'ईव्हीएम'मध्ये गडबड होऊ शकते का?
- होय : 37 टक्के
- नाही : 48 टक्के
- सांगता येत नाही : 15 टक्के |
|