Lockdown : रेशनवर धान्य मिळेना; लेकरांना काय खायला द्यायचे?

women are worried due to not getting grains on ration card.jpg
women are worried due to not getting grains on ration card.jpg

कोथरुड : जीवनावश्यक वस्तु मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे सरकारने जाहीर केले खरे परंतु रेशनवरील हक्काचे धान्यही आम्हाला मिळत नसल्याने लेकरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे महिलांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोथरुड पोलिस स्टेशन जवळ असलेल्या लक्ष्मीनगर व लोकमान्य वसाहत येथील महिलांशी संवाद साधला असता लोकमान्य वसाहतीमधील १७१ व लक्ष्मीनगर मधील २९ महिलांनी रेशनकार्ड असून धान्य मिळत नसल्याचे सांगितले. लक्ष्मीनगर मधील १२ महिलांनी सांगितले की, ''आम्ही भाडेकरु असल्याने आमच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे आम्हालाही धान्य मिळत नाही. विधवा, परित्यक्ता, वृध्द महिलांची अवस्था आणखी बिकट आहे.

गरीबांना उपाशी राहण्याची वेळ येवू नये म्हणून रेशन सुरु झाले. अंत्योदय आणि शहरी गरीब यांनाच सध्या रेशनवर धान्य मिळतेय. लॉकडाऊनमुळे अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटूंबांना कसे धान्य देणार असा सवाल वस्तीमधील महिला विचारत आहेत.

अबोली कांबळे म्हणाली की, धुण भांडी करुन आम्ही पोट भरतो. आता कामच नाही तर पैसे कोठून आणणार. धान्यच नाही तर लेकरं जगणार कशी. सगळ्या महिला घरी आहेत. बाहेर पोलिस जावू देत नाही. बाहेर गेले नाही तर घरात धान्य येणार नाही. घर भागवण्यासाठी कशी व्यवस्था करता येईल याची चिंता आम्हाला पडली आहे.  अडचणीच्या काळात धान्य मिळणार नसेल तर उपयोग काय. जर रेशन मिळत नसेल तर लोकांनी काय फाशी घ्यायची काय?

लक्ष्मी भंडारे म्हणाल्या आम्ही चार जण आहेत. पाच किलो गहू चार किलो तांदूळ मिळतो. त्यामध्ये आमचे भागत नाही. दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ महिन्यासाठी मिळायला हवे. धान्य पुरत नाही त्यामुळे दुकानातून आणावे लागते.

नंदा वाघमारे म्हणाल्या, ''मी हॉटेलात भांडे घासते आता ते बंद झाले. आता काहीच करत नाही. रेशनकार्ड घेवून हिंडते. तर ते हाकलून देतात.नंदा शिंदे म्हणाल्या की, ''मी विधवा आहे. दुकानदार रेशनकार्ड फेकून देतो. अगोदर काम करत होते. आता कोरोनामुळे काम बंद आहे. त्यामुळे घरामध्ये खायचे वांदे झाले आहे.
 
पंतप्रधानांच्या जाहीर आश्वासनाला सात दिवस पूर्ण झाल्यानंतर सुध्दा येथील लोकांना धान्य मिळालेले नाही. तीन महिन्यासाठी मिळणाऱ्या रेशनचे सोडा नेहमीच्या हक्काचेही रेशन आम्हाला मिळत नाही. ८० कोटी लोकांना रेशन देण्याचा वादा करणाऱ्या पंतप्रधान मोंदीच्या शब्दाला अधिकाऱ्यांनी खोटे पाडू नये.

सुनिता शिंदे म्हणाल्या," मी मुंबईला राहात होते. पती वारले म्हणून इथे आले. आता इथेच काम करुन राहते. रेशनकार्ड काढले आहे. पण दुकानदार म्हणतो तुमचे नाव यामध्ये नाही. त्यामुळे अजूनपर्यंत धान्य मिळाले नाही.

रेशन दुकानदार योगेश पाटोळे म्हणाले की, "'एका माणसाला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ या प्रमाणे कार्डधारकांना धान्य देतो. तीन महिन्याचा साठा करण्यासाठी जे धान्य देणार आहे ते अजून आमच्याकडे आलेले नाही.''

सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष विजय डाकले म्हणाले की,''अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला सावरायची संधी सुध्दा मिळाली नाही. येथील झोपडयांमध्ये असंख्य नागरिक असे आहेत की त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. मजूरांची स्थिती खुपच हालाकीची झाली आहे. विशेष बाब म्हणून अशा लोकांना धान्याची व्यवस्था सरकारने करुन द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे. ''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com