

तरुणांच्या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर
चापडगाव, ता. २२ : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने २० ऑगस्ट रोजी चापडगाव (ता. शेवगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ग्रामसभा विविध प्रश्नांमुळे चांगलीच वादळी ठरली. ग्रामसभेत तरुणांनी विकासकामे, पाणीपुरवठा, आरोग्य, शासकीय योजना आणि ग्रामपंचायतीच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला.
ग्रामसभेच्या सुरुवातीला प्रशासक काकडे यांनी सोळाव्या वित्त आयोगाचा आराखडा सभेसमोर वाचून दाखविला. यावेळी काही तरुणांनी आराखड्यातील कामांबाबत आक्षेप नोंदवत संबंधित कामांची गरज, प्राधान्यक्रम आणि निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले.
त्यानंतर आरोग्यसेवकांनी ग्रामीण आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत माहिती दिली. गावातील नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दूषित पाणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित करून पाण्याचे योग्य प्रकारे शुद्धीकरण केले जाते का, अशी विचारणा करण्यात आली. यावर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.