

Economic impact of monsoon on Indian agriculture and stock market by Gaurav Bora
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय अर्थव्यवस्थेचा खरा कणा कोणता?’’ असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर आजही ‘मॉन्सून’ हेच आहे. भारतीय हवामान विभागानुसार, देशातील वार्षिक पावसापैकी सुमारे ७० टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. त्यामुळे मॉन्सून उशिरा येणे किंवा अपेक्षेपेक्षा कमी पडणे, हा केवळ हवामानापुरता मर्यादित विषय राहत नाही; त्याचे थेट परिणाम शेती, उद्योग, महागाई, ग्राहकांची क्रयशक्ती आणि शेअर बाजारावरही उमटतात. भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वांत मोठा ‘अनिश्चितता निर्देशांक’ कोणता असेल, तर तो म्हणजे मॉन्सून! कारण, भारताच्या सुमारे ४५ टक्के कामगारवर्गाचा रोजगार शेतीवर अवलंबून आहे आणि देशातील सुमारे ५५ टक्के शेती अजूनही पावसावरच चालते. त्यामुळे मॉन्सूनमधील प्रत्येक एक टक्का तूट ही केवळ शेतीची नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेची चिंता बनू शकते. भारतीय शेअर बाजारावर परिणाम करणारे व्याजदर, डॉलर, कच्चे तेल, भू-राजकीय घडामोडी आणि कॉर्पोरेट निकाल असे अनेक घटक आहेत. मात्र, या सर्वांमध्ये एक असा घटक आहे ज्यावर भारताचे कोणतेही नियंत्रण नाही, तो म्हणजे मॉन्सून. यंदा मॉन्सूनच्या आगमनात झालेला विलंब आणि अनेक भागांतील कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.