

War Heat Pushes Oil Market Into Turmoil
sakal
-सुहास राजदेरकर, भांडवली बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक
अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने ‘टेरिफ’ बेकायदा ठरविल्यानंतर इस्राईल-अमेरिका-इराण युद्ध लगेच सुरू झाले. युद्धात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग न घेतासुद्धा आपले मोठे नुकसान होत आहे. कारण आहे- कच्चे तेल. भारत ९० टक्के तेल आयात करतो. यातील साधारणपणे ५३ टक्के तेल हे इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून येते. जगामध्ये याचे प्रमाण साधारणपणे २६ टक्के आहे. युद्धामुळे या खाडीमधून तेलवाहतूक जोखमीची झाल्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. फक्त सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि इराक यांच्याकडून या मार्गाने आपल्याकडे रोज तब्बल २८०० पिंप तेल येते. एका पिंपामध्ये साधारणपणे १६० लिटर तेल असते. अमेरिका आणि रशियाकडून आयात होणारे तेल होर्मुझ सामुद्रधुनीमधून येत नाही. परंतु, आपल्याला रशियाकडून याआधी तेलाच्या किमतीमध्ये जी सवलत मिळत होती, ती आता या युद्धामुळे मिळेल की नाही, ही शंका आहे.