

The Semiconductor Race: India’s Strategic Entry into Global Chip Manufacturing
sakal
अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्लेषक
‘डेटा हे नवे तेल आहे’ असे आपण म्हणतो; पण त्या डेटावर चालणाऱ्या जगाचा खरा पाया म्हणजे सेमिकंडक्टर चिप. मोबाइल, मोटारी, ‘एआय’चे कामकाज, क्षेपणास्त्रे, वैद्यकीय उपकरणे आदींचे काम या सेमिकंडक्टर चिपशिवाय होऊच शकत नाही, त्यामुळेच भारताने सेमिकंडक्टर क्षेत्रात घेतलेली झेप ही केवळ उद्योगधंद्याची बातमी नसून, आर्थिक आणि सामरिक स्वावलंबनाची सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. गुजरातमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि ‘एएसएमएल’ या आघाडीच्या डच कंपनीमधला करार याच दृष्टीने महत्त्वाचा आहे. ‘एएसएमएल’ ही जगातील लिथोग्राफीसाठी अत्याधुनिक यंत्रे बनवणारी कंपनी आहे. साध्या भाषेत सांगायचे, तर चिपवर अतिशय सूक्ष्म आकाराची रचना करून त्यात सर्किट बसवण्याचे काम ही यंत्रे करतात.