

Upskill or Exit: The New Reality for IT Professionals in the Age of Artificial Intelligence
Sakal
अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्लेषक
अपेक्षेप्रमाणेच भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांनी ‘एआय’च्या झपाट्याशी जुळवून घेण्यासाठी वेगाने पावले टाकायला सुरुवात केल्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा या आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या ‘बेंच’मध्ये तब्बल पावपट घट झाली आहे. ज्या लोकांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम नसते; पण भविष्यात येऊ घातलेले काम करू शकतील, त्यांना या कंपन्या काही काळ फुकट पगार देत राहतात. या लोकांच्या संचाला ‘बेंच’ म्हणतात. मोठ्या स्वरूपाची कामे मिळाल्यावर ती पूर्ण करण्यासाठी अशा राखीव लोकांचा साठा मोठ्या प्रमाणात असे. आता मात्र ‘एआय’ने ही सर्व समीकरणे पार बदलून टाकली आहेत. कंपन्यांकडे मनुष्यबळ किती, या निकषाला आता पूर्णपणे छेद मिळालेला असून, ‘एआय’चा वापर करून लोक किती वेगाने आणि किती प्रमाणात आपले काम पूर्ण करू शकतात, हाच कळीचा मुद्दा बनलेला आहे.